मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता आगामी विधानसभा समोर पाहता राजकीय नेतेमंडळीनी एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यास सुरवात केली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट आरोप केले आहे. ते म्हणाले कि, जिथे सत्ता असेल तिथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंब असतेच कारण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सन १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता आली त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडिलांना मंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर युपीएचं सरकार आलं त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांना मिळालं आणि आता NDA प्रणित भाजपची सत्ता आल्यावर ते त्यांच्याकडे वळले आहेत.त्यामुळे जिकडे सत्ता तिकडे विखे घराणे असे सत्ता समीकरणाचे गणित आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विखे पाटीलांचा मुलगा ज्यावेळी भाजपामध्ये गेला त्याचवेळीच राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा भाजपात गेल्यासारखे होते. फक्त चर्चेत राहण्यासाठी टप्प्याटप्प्याने ते निर्णय जाहीर करीत आहेत, असा आरोप मलिक यांनी केला आहे. विखे यांनी आज आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या अगोदरच त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला होता.