इंदोर बहुजननामा : आपल्या बहिणीने खालच्या जातीतील मुलाशी पळून जाऊन विवाह केल्याच्या रागातून सावत्र भावाने बहिणीवर गोळ्या झाडून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा “सैराट” ची पुनरावृत्ती झालेली दिसून येते. इंदोर जवळील रावद गावातील हि घटना घडली असून परिसरात एकच खळबळ माजली आहे. बुलबुल असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या अल्पवयीन भावाला त्याब्यात घेतले असून तो अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारकगृहात पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार , बुलबुल राहत असलेल्या रावद गावामध्येच कुलदीप नावाच्या युवकाशी तिचे प्रेम संबंध जुळले. त्यांची चर्चा संपूर्ण गावात झाली. कुलदीप च्या घरातील आर्थिक परिस्थिती बेताची त्यात तो खालच्या जातीचा असल्याने बुलबुल च्या घरच्यांनी त्यांच्या या नात्याला मान्यता दिली नाही. घरच्यांनी विरोध दर्शविल्याने दोघांनी पळून जाऊन लग्न केले आणि दुसऱ्या गावी स्थायिक झाले.
विवाह झाल्यानंतर वातावरण शांत झाल्याने दोघे गावात परत आले, हि बातमी बुलबुल च्या घरच्यांना समजली. तिचा सावत्र भाऊ तिच्या घरी गेला आणि वाद घालू लागला. भांडण वाढल्याने त्याने खिशातून पिस्तूल काढून तिच्या वर गोळीबार केला आणि तिची हत्या केली. शेजारच्यांनी आवाज ऐकल्याने सगळ्यांनी बुलबुल च्या घरी धाव घेतली , रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बुलबुल ला उपचारासाठी नेण्यात आले , परंतु उपचार दरम्यानच मृत्यू झाला. कुलदीप याच्या तक्रारीवरून बुलबुल च्या सावत्र भावाला अटक करून बालसुधारक गृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.