मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – बसपा प्रमुख मायावती यांनी काँग्रेस सरकारला केलेला इशारा मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी गांभीर्याने घेत, केलेल्या मागणी पूर्ण करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांच्या संबंधीच्या कायद्याबाबत दिलेल्या निर्णयावरून २ एप्रिल, २०१८ रोजी “भारत बंद’चे आयोजन करण्यात आले होते. या बंदच्या काळामध्ये बारा राज्यांमध्ये हिंसाचार झाला होता. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ लोकांनी आपले प्राण गमावले होते.दरम्यान दलित कार्यकर्ते आणि संघंटनाच्या विरुद्ध प्रशासनातर्फे गुन्हे दाखल करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर त्यांना ताब्यातही घेण्यात आले होते.
दरम्यान २ एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या भारत बंद दरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या, अन्यथा राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्याचा पुनर्विचार करावा लागेल असा इशारा बसपा प्रमुख मायावती यांनी काँग्रेसला दिला होता. मायावती यांच्या त्या इशाऱ्याला मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी गांभीर्याने घेऊन वेगाने हालचाली करीत दलित कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.