सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – मी मुख्यमंत्री असताना मातंग समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक प्रगतीकरिता क्रांतीवीर लहुजी वस्ताद अभ्यास आयोगाची स्थापना केली. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर मात्र या आयोगाकडे कोणीही लक्ष दिले नाही हे दुर्दैवी आहे.
अण्णाभाऊ साठेंची जशी हेळसांड झाली तशीच हेळसांड मातंग समाजाची झाली. मुळात मातंग समाज हा गरीब परंतु स्वाभिमानी आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना व क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या लहुजी क्रांती समाज भूषण तथा युवा पुरस्काराचे वितरण समारंभात ते बोलत होते.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, देवेंद्र भंडारे, भीमराव गायकवाड, मारुती देसाई, अरुण वर्मा आदींची उपस्थिती होती.मिलिंद अष्टुळ, दादासाहेब वाघमारे, ज्ञानदेव खंडागळे, बबनराव जोगदंड, प्रा. श्रीधर कांबळे, सुनील खवळे, रामभाऊ वाघमारे यांना लहुजी क्रांती समाजभूषण तर सुधाकर पाटोळे, तुकाराम गेजगे, बापुजी गायकवाड, सोमनाथ तोरणे, महेश डोलारे, शांतीलाल साबळे, विश्वास शिंदे, सोहम लोंढे, सतीश बगाडे यांना लहुजी क्रांती युवा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आला.
सुरेश पाटोळे यांनी प्रास्ताविक केले. लखन गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.