अकोला : बहुजननामा ऑनलाइन – भारतीय सेनेतील मराठा लाइट इन्फेन्ट्री रेजिमेंटला स्थापन होऊन २५० दिवस झाले आहेत. ज्या हुतात्म्यांनी आपली गौरवशाली परंपरा राखून बलिदान देऊन मराठा लाइट इन्फेन्ट्री रेजिमेंटचे नाव देशात सोनेरी अक्षरात कोरून ठेवले, अशा वीर हुतात्म्यांच्या वीरपत्नी, वीरमाता यांचा सत्कार सोहळा १४ मराठा बटालियनचे हर्षल रामकृष्ण खंडारे व प्रवीण कोगदे यांच्यावतीने पातूर तालुक्यातील शिर्ला येथे उत्साहात पार पडला.
यावेळी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी अशोक अमानकर, बाळापूर उप विभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, पातूर तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी, से.नि. कॅप्टन रामदास सावंत, सुभाष हरणे, सैनिक बोर्डचे गजानन पवार, विनायक महाजन, शहीद कैलास निमकंडे यांची वीरमाता-पिता मंदाताई निमकंडे व काशीराम निमकंडे, शहीद आनंद काळपांडे यांच्या वीरपत्नी विमलताई काळपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अकोला जिल्ह्यातील समस्त आजी-माजी से.नि. सैनिक यांची उपस्थिती असल्याने गावाला सैनिक छावणीचे स्वरूप आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला निलेश गाडगे तथा एज्यु विला शाळेचे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ड्रम वाद्य वाजवून सलामी देऊन स्वागत केले. प्रमुख अतिथी यांनी शहीद कैलास निमकंडे यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण केले तथा वीरमाता मंदाताई निमकंडे तथा वीरपत्नी विमलताई काळपांडे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन सुमित वानखडे यांनी, तर वसंत चतरकर यांनी मराठा लाइट इन्फेन्ट्रीचा इतिहास सांगितला.
यावेळी कृष्णा अंधारे, भीमराव गाडगे, सुहास कोकाटे, दामोधर अंधारे, रामकृष्ण खंडारे, विश्वनाथ सावंत, विशाल खंडारे, देवीदास निमकंडे, निखिल खंडारे, विलास निमकंडे, मंगेश निमकंडे, राजू कोकाटे, पांडुरंग हिरळकर, नीलेश खंडारे, तेजराव इंगळे तथा सैनिक मंगेश इंगळे, सुदर्शन बगाडे, किशोर पाथरकर, संदीप धोटे आदींनी परिश्रम घेतले.