कल्याण : बहुजननामा ऑनलाईन –भाजपशी मी युती केली याचा अर्थ त्यांच्याशी आमची वैचारिक युती झालेली नाही. त्यांच्याशी आमचा विरोध कायम असून त्यांच्या विचारधारेशी आमचा कसलाही संबंध नाही. माझा निळा झेंडा आहे त्यांचा भगवा झेंडा आहे. माझा निळा झेंडा मी कधीच सोडणार नाही असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कल्याण येथे केले आहे.
कल्याण येथील विठ्ठलवाडी बस डेपोजवळील गंगाधर पानतावणो साहित्यनगरीत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनात रामदास आठवले यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी हे विधान केले आहे. आंबेडकरी समाजातील साहित्यिक , प्राध्यापक ,विचारवंत यांच्या सोबत पुणे, नागपूर, मुंबई या ठिकाणी आपण बैठका घेतल्या आणि त्या बैठकीत भाजप सोबत जाण्याच्या निर्णयावर एक मत झाल्यावरच मी भाजप युतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी आठवले यांच्या सोबत मारहाणीचा प्रकार झाला. अंबरनाथमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याने आठवले यांच्या सोबत मारहाण केली त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. तर आठवले यांच्यावर आंबेडकरी समाजातील व्यक्तीने हल्ला करण्याचे कारण हे कि त्यांनी भाजप सोबत केलेली युती असे आंबेडरकरी समाजात बोलले असताना आठवले यांनी याबद्दल स्वतःच खुलासा दिला आहे. आपण सर्व समाजाला एकत्रित करूनच विचार विनिमय करूनच भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे असे रामदास आठवले यांनी म्हणले आहे. तर आपण निळ्या झेंड्याचा आहे असे म्हणत आंबेडकरी जनतेला भावनिक गरळ घालण्याचा प्रयत्न केला आहे.
रामदास आठवले हे विचारधारेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा पुरस्कार करत आलेले आहेत. त्यांनी नेहमी बुद्ध धर्माचा विचार केलेला आहे. त्यांनी आठवले बोलतानाही बाबासाहेब आणि बुध्दांचे दाखले देतात. दलित पँथरच्या चळवळी पासून सुरु झालेले आठवले यांचे राजकारण आज राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहचले आहे. त्यांच्या संघटनाच्या बांधणीच्या जोरावर त्यांनी राजकारणात हे यश कमावले आहे असे राजकीय जाणकार म्हणतात. तर आठवलेंनी आगामी निवडणुकीच्या धरतीवर आंबेडकरी जनतेला जवळ करण्याची रणनीती राबवण्यासाठी सुरुवात केली आहे.