बीड : बहुजननामा ऑनलाइन – देशात साखरेचे उत्पादन २० टक्के अधिक होत असताना मोदी सरकारने पाकिस्तानातून २० लाख मे. टन साखर आयात केली. देशात जादा साखर असताना बाहेरुन साखर घेण्याची गरज काय? असा सवाल करुन शेतकरी विरोधी धोरण राबविणाऱ्या भाजपविरुध्द बोलण्याची काँग्रेस, राष्ट्रवादीत हिंमत नाही असा घणाघात भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
सत्ताधारी चौकशा लावतील अशी भीती असल्याने कोणी बोलत नाही असा टोला त्यांनी लगावला.येथील बार्शी रोडवरील बिंदूसरा नदीपात्रात वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा पार पडली. यावेळी ‘उपरा’कार लक्ष्मण माने, माजी आ. हरिभाऊ भदे, एमआयएमचे प्रवक्ते मुफ्ती कामील, डॉ. इंद्रकुमार भिसे, सचिन माळी, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम, अमित भोईजळ, रविकांत राठोड, प्रा. विष्णू चव्हाण, भीमराव सातपुते, विष्णू देवकते, जितीन वंजारे यांची उपस्थिती होती. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपला देशाचा गाडा हाकता येत नाही हे अनेक निर्णयांवरुन सिध्द झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी सवर्णांना दिलेल्या १० टक्के आरक्षणावरुन त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.नोटबंदीसारख्या निर्णयानंतर सामान्यांनी बँकांमध्ये जाऊन नोटा बदलून घेतल्या. मात्र, ज्यांच्याकडे काळे धन होते, त्यांना १०० रुपयांमागे केवळ ६० रुपये मिळाले. ४० टक्के सरकार व लुटारुंनीच खाल्ल्याचा आरोप त्यांनी केला. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी आपल्या भाषणात मुंडे, क्षीरसागर कुटुंबावर टीकास्त्र सोडले.
हे दोन्ही घराणे पर्याय निर्माण होऊ देत नाहीत. क्षीरसागरांनी आजपर्यंत केवळ मतदारांचा वापर करुन घेतल्याचा आरोप त्यांनी केला. पालिका निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला. मात्र, आता विधानसभा, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ताकदीने मैदानात उतरणार आहे. एमआयएम भारिपसोबत खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले..