मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – भाजपला बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा उपयोग फक्त राममंदीरासारखा, ‘मंदीर वहीं बनायेंगे’ असा निवडणुकीपुरता करायचा आहे का? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. काँग्रेसला इंदू मिलची जागा बळकवायची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर त्यांनी हे प्रतिउत्तर दिले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला इंदू मिलची जागा बळकवायची होती असा जावईशोध लावला आहे. मुख्यमंत्र्यांचा खोटं बोलण्यामध्ये हात कोणीही पकडू शकत नाही. साक्षात पंतप्रधानांकडून त्यांना ही दिक्षा मिळालेली आहे. बेताल वक्तव्ये, अप्रचार, खोटे बोलणे हा भाजपच्या निवडणुक रणनितीचा भाग आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेतून ही खोटे बोलण्याची प्रक्रिया त्यांना आली आहे. याचबरोबर आता निवडणुका आल्या आहेत तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते अशी वक्तव्ये सुद्धा त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको अशी टीकाही त्यांनी केली. इतकेच नव्हे तर संघाचे लोक खोटे बोलतात अप्रचार, बदनामी करतात यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघाला विरोध होता.
विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक इंदू मिलमध्ये करू हे काँग्रेसच्या निवडणूक जाहिरनाम्यामध्ये सांगितले होते. प्रिन्सिपल अप्रूवल आणण्याचे कामसुद्धा आम्ही केले, भाजपला फक्त निवडणुकीसाठी स्मारकाचा वापर आम्ही केला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत काँग्रेस पक्षाने काय केले हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगायची आवश्यकता नाही. असेही ते म्हटले.
काँग्रेसला आता सगळ्या दलित, मागसवर्गीय समाजाचा पाठिंबा मिळत आहे. आणि खऱ्या अर्थाने सगळ्या दलित, मागासवर्गीय समाजाला कळून चुकले आहे, की हे सरकार आपले नाही. त्यामुळे त्यांच्यातील जनआक्रोश आता वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसची बदनामी करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतःची काळजी करावी असेही ते म्हटले.