जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील समाज क्रांतीच्या गंगोत्रीचा उगम महात्मा फुले यांच्या घरातून झाला असून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व समाजासमोर आहेत. फुले दाम्पत्याचे कार्य महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून देशव्यापी होते. फुले दाम्पत्यास येत्या २६ जानेवारीपूर्वी ‘भारतरत्न’ सन्मान मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे ठोस स्वरूपात शिफारस आणि पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी प्रत्यक्ष भेटून सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
फुले दाम्पत्यास ‘भारतरत्न’ सन्मान मिळावा यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून मागील ३ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मुंबई येथे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ सन्मान देण्यात यावा याबाबतचे पत्र प्रत्यक्ष भेटीअंती दिले आहे. राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रात म्हटलेय की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे सपूर्ण जीवन हे समाजक्रांतीचे प्रतीक आहे. फुले दाम्पत्याने शेतकरी महिला जातीभेद आणि शैक्षणिक सामाजिक जनजागृती केली आहे. त्यामुळे याप्रश्नी त्यांची भूमिका समजून घेऊनच पुढे जावे लागते.
या दाम्पत्याची समकालीनांनी उपेक्षा केली आहे. तशीच उपेक्षा आजच्या काळात शासनाकडून होऊ नये, अशी अपेक्षा ना.पाटील यांनी पत्रकातून व्यक्त केली आहे. फुले दाम्पत्यास ‘भारतरत्न’ सन्मान २६ जानेवारी २०१९ पूर्वी मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावा, अशी मागणी केली आहे.