अमरावती : बहुजननामा ऑनलाइन – भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करणे महागात पडेल अशा आशयाचा इशारा दिला आहे. ‘मी गेल्यावर माझ्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली तर मी पूर्ण भारतातून मोठी फौज महाराष्ट्रात पाठवेन’, असा इशारा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी दिला आहे. आज अमरावतीमध्ये आझाद बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. इतकेच नाही तर यावेळी त्यांनी भाजप सरकारवरही जोरदार हल्लाबोल केल्याचे दिसून आले.
यावेळी बोलताना आझाद यांनी सभा घेण्याची संधी मिळाल्याचा आनंदही व्यक्त केला आहे. आझाद म्हणाले की, “भाजप सरकारने माझ्या तीन सभा रद्द केल्या, मात्र अखेर मी अशा ठिकाणी सभा करत आहे जेथे माझे पितृतुल्य काशीराम यांनी भाषण केले होते.” इतकेच नाही तर, ‘आज मी पोटभर बोलणार, कारण मी महाराष्ट्रात बोलत आहे. हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे’ असेही आझाद यावेळी म्हणाले.
पुढे ते असेही म्हणाले की, “संविधान कितीही चांगला असला तरी त्याला चालवणारे चांगले असायला पाहिजे. संविधानाचा गैरवापर करुन भाजप सरकारने मला 16 महिने कैदेत ठेवले.” इतकेच नाही तर, ‘मी येथून गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यावर कारवाई केली तर देशभरातून महाराष्ट्रात फौज पाठवेन’ असा इशाराही आझाद यांनी दिला. शिक्षण आणि आरोग्यसेवा मोफत झाली पाहिजे
देशातील गरीब उपचाराअभावी रस्त्यावर मरत आहेत, तसंच औषधं नसल्याने देशात दरवर्षी 10 हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे देशात शिक्षण आणि आरोग्यसेवा मोफत झाली पाहिजे, अशी सूचना चंद्रशेखर आझाद यांनी केली.
देशभर आंदोलन उभारणार
ओबीसी आणि मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारावरही आझाद यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “आज मुस्लिम आणि ओबीसी समाज भयभीत आहे. पण या पुढे जर या समाजावर अत्याचार झाले तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही देशभर आंदोलन उभारु.”
भीम आर्मीचे कुणालाही समर्थन नाही
महाराष्ट्रात भविष्यात जे होईल ते येथील जनता ठरवेल. भीम आर्मीने अजूनपर्यंत कुणालाच समर्थन जाहीर केले नाही, असेही आझाद म्हणाले. आपले मत विकले नाही गेले पाहिजे, असे आवाहनही आझाद यांनी युवकांना केले. याशिवाय, भीम आर्मीचे एकच लक्ष असणार आहे ते म्हणजे संविधानावर चालणे आणि चालायला शिकवणे. असेही चंद्रशेखर आझाद म्हणले.