तुर्भे : बहुजननामा ऑनलाईन – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात खोचक टीका केले आहे.
रिपाइंचे माजी जिल्हाअध्यक्ष पँथर नामदेव गायकवाड यांच्या 6 व्या स्मृति दिनानिमित पँथर नामदेवराव गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने,वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण आणि समाजरत्न पुरस्कार सोहळ आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे गुणवंत व्यक्ती आणि आदर्श धार्मिक संस्था, तसेच सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे होते. त्यावेळी “एकीकडे हिंदुत्ववादी व सनातनी विचारधारेला प्रखर विरोध करायचा आणि दुसरीकडे खासदार ओवेसी यांच्या एमआयएमसह अन्य पक्षाची मोट बांधून निवडणूकीत भारतीय जनता पक्षास पोषक वातावरण निर्माण करायचे. ही भाजपास अप्रत्यक्ष मदत नाही का ? अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता केली.
याचबरोबर १९७२ साली दलितांवर होणारे हल्ले, अन्याय अत्याचाराला विरोध करण्यासाठी दलित पँथर स्थापन झाली. नामदेव गायकवाड हे देखील पँथरच्या सुरुवातीपासून या लढ्यात अग्रभागी होते. पँथर चळवळीत जीव ओतून काम करणारे नामदेव गायकवाड सारख्या हजारो युवकांनी मराठवाडा नामांतर चळवळ ,लॉंग मार्च, रिडल्स सारख्या आंदोलनात सक्रीय भाग घेतला.असेही ते म्हंटले. इतकेच नव्हे तर,आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पँथर संघटनेच्या महाराष्टभर छावण्या होत्या. त्याचवेळी १९९० साली आंबेडकरी समाजात ऐक्याच्या मनस्थितीत होता. पँथर बरखास्त करू नका तिचे स्वतन्त्र अस्तित्व राहू द्या असा दबाव माझ्यावर पँथर छावणी प्रमुख यांच्याकडून येत होता. मात्र ऐक्यास आठवले विरोध करतात असा समज होइल म्हणून मी नाईलाजाने पँथर बरखास्त केली,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे आज मी भाजपा मंत्रिमंडळ मध्ये असून भाजपा सोडणे आता इतक्यात शक्य नसल्याचेही त्यांनी म्हंटले. दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पँथर नामदेव गायकवाड यांच्या स्मरणार्थ ४० जणांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण व समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.