नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – संविधान बदलण्याचे तर सोडाच परंतु त्याला हात सुध्दा लावण्याची ताकद कोणातही नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय आंबेडकर महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्या गौतम यांनी केले. अखिल भारतीय आंबेडकर महासभा जिल्हा शाखेच्या वतीने नामविस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला बहूजन एकता परिषदेचे आयोजन शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात नुकतेच करण्यात आले. सदर परिषदेच्या अध्यक्षस्थानी संशोधक डॉ. सिद्धार्थ जोंधळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द विचारवंत भीमराव हाटकर, संघटनेचे प्रदेश महासचिव नामदेव दीपक, मराठवाडा प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा दीक्षामाला नरवाडे यांची उपस्थिती होती.
विद्या गौतम म्हणाल्या, की सामाजिक, धार्मिक व राजकीय या क्रांतीसोबतच आर्थिक क्रांती सुध्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्यांनी शिक्षण, नोकरी यात आरक्षण तर ठेवलेच परंतु संविधानाच्या माध्यमातून बहुजनांवर उपासमारीची वेळ येवू नये म्हणून मानवानांचे काय परंतु जनावरांना सुध्दा खाद्याची व्यवस्था करुन ठेवली आहे. चारा घोटाळा हा केवळ बिहारमध्येच झाला आहे काय असा सवाल करुन इतर राज्यामध्ये जनावरांचे खाद्य गेले कुठे याचा शोध घेण्याची गरज आहे. डॉ. जोंधळे म्हणाले, की मनाची, चित्ताची शुध्दी केल्याशिवाय क्रांतीच होवू शकत नाही.
भगवान गौतम बुद्ध यांनी जे सांगितले तेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात. धम्माची क्रांती केली तर विश्वाची क्रांती होते. अनेक आजारावर न्यानो व सुपरन्यानो टेक्नॉलॉजीने मात करता येते. आज बुद्धाच्या विज्ञाननिष्ठ तत्वावर गणित, भौतिकशास्त्र व धम्मग्रंथ निर्माण होत आहेत. धम्म कळाल्याशिवाय क्रांती करणे अशक्यच आहे.भीमराव हाटकर यांनीही भाषण केले. श्रावण नरवाडे यांनी प्रास्ताविक केले. सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ. आंबेडकर अवॉर्ड एन. डी. गवळे (आंबेडकरी चळवळ), सदाशिव गच्चे, संभाजी कांबळे (पत्रकारिता), साहेबराव शेळके (कलाक्षेत्र), कपिल सोनाळे, प्रकाश वागरे, पी. के. खानापुरकर यांना प्रदान करण्यात आले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी अनिता गोडबोले, अशोक हिंगोले, भीमराव सातोरे, राहुल नरवाडे, मनोहर खोसले यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले.