अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – सध्या राज्यात दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळ निवारण्यासाठी केंद्राच्या योजनेवर राज्यसरकार अवलंबून नाही. दुष्काळी उपाययोजनेसाठी जितका निधी लागेल तो पुरवला जाईल. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रसंगी राज्याची तिजोरी खाली करु, अशी ठाम ग्वाही देतानाच धनगर आरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी हा मुद्दा मार्गी लागेल, असा विश्वास पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.
पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर जिल्ह्याच्या नगर दौऱ्यावर आले असता, शासकीय विश्रामगृहावर उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. नगर जिल्ह्यातील पारनेर, शेवगाव, संगमनेर, कर्जत, जामखेड या तालुक्यांना पाइपलाइनने पाणी देण्याचा विचार आहे. मागील काळात पाणीपुरवठा योजना बंद पडल्या होत्या. त्या पूर्वरत करण्यासाठी ३८ कोटी रुपयांचा निधी महावितरणला वर्ग करण्यात आला आहे. आवश्यकता बघून तातडीने टँकर सुरू करण्यात येणार आहे. सरकारने जलयुक्त अभियान राबविले, परंतु आकाशातून पाणी पडले नाही.
त्याला काय करणार, पाऊस पडल्यानंतर मात्र त्याचा परिणाम जाणवेल. धनगर आरक्षणाच्या मुद्याबाबत बोलताना जानकर म्हणाले, देशात धनगर समाजाला कुठेही आरक्षण नाही. आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आरक्षणाचा प्रश्न हा केंद्रीय स्तरावरील असल्याने, यासाठी टीसचा अहवाल तयार करण्यात येत आहे. तो अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत घेऊन आपण लवकरच दिल्लीला जाणार असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी हा मुद्दा मार्गी लागेल.