नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – केंद्राने सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील लोकांना अधिकार मिळणार असतील, तर आनंद होईल असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी सांगत, निवडणुकीपूर्वीची ही राजकीय खेठळी असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
नाशिक येथे खासगी कार्यक्रमानिमित्त आल्या असता, शासकीय विश्रामगृहात सीमा आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. तसेच या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील लोकांना अधिकार मिळत असतील, तर त्याचा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक मागास वर्गाला आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा विचार आगोदरपासूनच होता. या संदर्भातील सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तो आता मांडण्यात आला आहे. या निर्णयाचा संबंध निवडणुकीशी लावता कामा नये असेही आठवले यांनी सांगितले. ना. रामदास आठवले यांनी आरक्षणाबाबत नेहमीच सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. केंद्रातदेखील त्यांनी अनेकदा आरक्षणाचा मुद्दा मांडलेला आहे.
आर्थिक निकषावर आरक्षण देण्याबाबत ना. आठवले यांची भूमिकादेखील महत्त्वाची असल्याचे सीमा आठवले यांनी सांगितले. या वेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी स्मिता आठवले यांनी कविताही सादर केली.