कोल्हापूर : बहुजननाम ऑनलाईन –स्मशानभूमीची ही जागा पूर्ववत समाजास मिळावी या मागणीसाठी समस्त बौद्ध समाजाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले आहे.
बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीने सध्या सुरू असलेल्या ड्रेनेज प्लान्टची जागा राखीव आहे. या जागेबाबत जिल्हा न्यायालयात दावा सुरू आहे. ही जागा महार वतनाची अल्पभूधारकांची असून, त्यांच्या जमिनी घेता येत नाहीत. त्यामुळे ही जागा समाजास परत मिळावी, अशी समाजाची मागणी आहे. यामुळे समस्त बौद्ध समाजाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे बौद्धविहारात वारंवार धम्म परिषदा होत असतात. अशा ठिकाणी आरोग्यास घातक असलेले मलनिस्सारण केंद्र उभारल्यास धार्मिक भावना दुखावल्या जाणार आहेत. त्याचबरोबर आरोगाचा प्रश्नही गंभीर होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून तो सोडवावा; अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
यादरम्यान दीपक भोसले, विजय कांबळे, अमोल कुरणे, दयानंद माळगे, प्रकाश कांबळे, गणपतराव कांबळे, अविनाश कांबळे, प्रकाश कांबळे, राहुल कांबळे, पुंडलिक कांबळे, किरण कांबळे, एम. के. कांबळे, अमर कांबळे, दिलीप कुरणे, के. के. कांबळे, प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते.