अमरोहा : वृत्तसंस्था – प्रेयसीने धोका दिल्याने मी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करायला निघालो आहे. साहेब, तुमचा फोन होल्डवर ठेवा, रेल्वे येताच मी उडी घेईन, ही वाक्य आहेत एका नशेत धुंद असलेल्या प्रियकराची. असा फोन येताच पोलीस ठाण्यात खळबळ उडाली अन् पोलिसांनी चक्र फिरवली. रेल्वेसमोर उडी मारण्यापूर्वीच त्या प्रियकराला ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात पोलिसांना यश आले. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील नगर कोतवाली परिसरातील ही घटना आहे.
दारुच्या नशेत धुंद असलेल्या त्या प्रियकराने शुक्रवारी (दि. 12) रात्री 1 वाजता त्याने 112 नंबर डायल करून आत्महत्या करत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावेळी कंट्रोल रुममधून पोलीस निरीक्षक रविंद्र सिंह याने प्रियकराला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो आत्महत्या करण्यावर ठाम होता. पण पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत त्याला ताब्यात घेऊन आत्महत्या करण्यापासून रोखले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जेंव्हा त्याला ताब्यात घेतले त्यावेळी तो नशेत तर्र होता. स्वतःला सावरणेही त्याला कठीण होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रियकराला टीपी नगर पोलीस ठाण्यात आणून त्याची समस्या जाणून घेतली, हा युवक मुलीसोबत लग्न करू इच्छित होता असे अधिका-याने सांगितले. 500 रुपये, काजू आणि मनुके मुलीला दिल्यानंतर तिने हे खूप कमी असल्याचे सांगत ते पैसे आणि काजू प्रियकराच्या अंगावर फेकून दिल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.