बहुजननामा ऑनलाइन टीम – गेल्या काही महिन्यांपासून देशात विरोधी पक्षातील नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात गांधी कुटुंब देखील(Raut) आहे. इतर नेतेही आहेत, आम्हीदेखील आहोत. पण असे किती प्रयत्न केले तरीही भविष्यात विरोधी पक्ष एकजुटीने उभा राहील, संघर्ष करेल. सत्ताधाऱ्यांनी देशाचा इतिहास पाहिला पाहिजे. विरोधी पक्ष आज दुबळा वाटत असला तरी अचानक फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतो आणि ताकद दाखवतो, असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
खा. राऊत ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, काँग्रेस हा सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीत पक्षाचे योगदान हे अत्यंत महत्वाचे आहे. पंडित नेहरु, इंदिरा गांधी आणि इतरांनीही देशासाठी खूप मोठा त्याग केला आहे. त्या पक्षाचे अध्यक्षपद हे देशातील आणि राजकारणातील एक महत्वाचे पद आहे. अशा काँग्रेसच्या नियोजित अध्यक्षाला ते विरोधी पक्षाचे नेते आहेत म्हणून अपशब्द वापरुन बोलण आपली संस्कृती नाही, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबाव्यतिरिक्त कोणीही नाही का जो पक्षाचे नेतृत्व करेल असे विचारले असता, ते म्हणाले की, हा प्रश्न आपण भाजपाबद्दल विचारला तर आजही नरेंद्र मोदीच नेते आहेत. पक्षात लोकशाही असल्याचे सांगत असले तरी ती कोणाच्या नावावर चालत आहे हे सर्वांना माहिती आहे. तसेच ते म्हणाले की, राज्यात ठाकरे कुटुंबाच्या नावाने पक्ष चालतो. प्रत्येक पक्षाचा एक चेहरा असतो. तो चेहरा म्हणजे घराणे नसते. कुटुंबानेही पक्ष उभा करण्यासाठी खूप त्याग केलेला असतो. यामध्ये गांधी कुटुंबही आहे. जर लोकांना गांधी कुटुंबच नेतृत्व करु शकते असे वाटत असेल तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यात आम्ही बोलण्याची गरज नाही.