पिंपरी बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सक्षम पर्याय म्हणून समोर आला. येणारी विधानसभा निवडणूक डोळयांसमोर ठेऊन महिला कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे. बूथ बांधणीबरोबरच जनसंपर्क ,सोशल मीडियावर भर द्यावा असे आवाहन प्रा.अंजलीताई आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघ यांच्या वतीने चिंचवड येथे ऍटो क्लस्टर या ठिकाणी चिंचवड ,भोसरी,पिंपरी ,मावळ विधानसभा मतदार संघातील महिला पदाधिकाऱ्यांच्या आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या.
या मेळाव्याला भारिप बहुजन महासंघाच्या महिला आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य निशा शेंडे ,अरुंधती शिरसाठ ,रेखा ठाकूर ,भारिप शहराध्यक्ष लता रोकडे ,अंजली तायडे ,आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना प्रा.अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या कि, राजकीय पटलावर वंचितची ताकद दिसून आली आहे. ३ जानेवारी २०१८ संपूर्ण देशाने आंबेडकरी चळवळीची ताकद पहिली त्यांनंतर आंबेडकरी समाज आपले रक्षण करू शकतो. असा विश्वास वाटल्यानेच समाजातील अनेक वंचित घटक वंचितआघाडीकडे आशेने बघत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जवळपास ४१ लाख मतं घेऊन आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. भारिप बरखास्त केला नसून राज्य आणि शहर पातळीवर पक्षाचे काम जोरदार सुरु आहे. मात्र राजकीय प्रतिसाद मिळणाऱ्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून त्यामध्ये भारिपच्या शाखेचा समावेश केला असल्याचे प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी म्हंटले आहे.