बहुजननामा ऑनलाइन टीम : अनेक दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्याचा सर्व ठिकाणी विरोध होताना दिसत आहे. अशामध्ये अनेक राज्यांनी हा कायदा लागू करण्यात मज्जाव केला आहे. महाराष्ट्रातही या कायद्यासंदर्भात संदिग्ध भूमिका दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या कायद्यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयानंतर विचार करु असे सांगितले आहे. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा, यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासूनच सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे वक्तव्य तसेच नागरिकत्व संशोधन विधेयकावरुन भाजपा आक्रमक पवित्रा घेणार आहे. याशिवाय शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी अतिवृष्टी, विकास कामांवरील स्थगिती या मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्यात येईल.
राज्य सरकारला यासंदर्भात असलेल्या अधिकारांसदर्भात राष्ट्रादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी नागपूर दौऱ्यानिमित्त दरम्यान चर्चा केली जाणार आहे. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सुद्धा नागपुरातच आहे. त्यामुळे यासंदर्भात निर्णय बैठकीनंतर घेण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधान भवन परिसरात आयोजित बैठकीत म्हटले आहे.
Visit : bahujannama.com