बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात अनेक उलाढाली होताना दिसून येत आहे. त्यात शनिवारी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी पक्षात फूट पाडत भाजपला पाठिंबा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर स्वत: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवारांनी या निर्णयात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोणतीही कल्पना दिली नाही. त्यामुळे अजित पवारांनी अचानक शरद पवार यांची साथ सोडून भाजपशी गेल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे अजित पवार यांनी नेमकी का बंडखोरी केली ? अशी चर्चा संपूर्ण राज्यभर सुरु आहे.
शरद पवार हे दिल्लीत कार्यरत असतात त्यामुळे राज्यातील पक्षाच्या नेतृत्वासाठी अजित पवार की सुप्रिया सुळे यांच्यात सुरुवातीपासूनच पक्ष अंतर्गत संघर्ष होता. मात्र शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना लोकसभेत संधी दिली तर राज्यात अजित पवार यांच्याकडे पक्षाचे अधिकार दिले. मात्र तरीही दोन्ही काका-पुतण्यामध्ये कोणत्या ना कोणत्या निर्णयावरून मतभेद होत असल्याचे समोर येतच राहिले. मात्र शरद पवारांनी कुटुंबातील हा संघर्ष चार भिंतींमध्येच ठेवला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. तरी जास्त जागा मिळूनही भाजप आणि शिवसेनेचे मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून न जुळल्याने त्यांच्यातील युती अखेर तुटली. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला.
महाआघाडीसोबत आलेल्या शिवसेनेला सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्रिपद ५ वर्षांसाठी देण्याचं ठरलं. मात्र नंतरच्या काळात राष्ट्रवादीकडूनही अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी समोर आली.त्यानंतर शिवसेनेकडून शरद पवार यांना अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं. असल्याचं अजित पवार यांना एका उद्योगपतीकडून सांगण्यात आलं. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये झालेला ह्या समझोत्या संदर्भात आपल्याला कल्पनाच दिली गेली नाही, असा अजित पवार यांचा समज झाला. त्यामुळे नंतरच्या अडीच वर्षांसाठी शरद पवार यांना सुप्रिया सुळेंनाच मुख्यमंत्री करायचे आहे की काय, अशी शंका अजित पवार यांच्या मनात निर्माण झाली. त्यातूनच मग अजित पवार यांनी हे पाऊल उचललं असल्याचं बोलले जात आहे.
Visit : bahujannama.com