नवी दिल्ली : वृत्तसंस्था – “ममता बॅनर्जी यांनी राज्यघटनेचे पालन करावे. जेव्हा त्या राज्यघटनेचे पालन करणार नाही तेव्हा मला यात पडावे लागते. लोकशाही निशाण्यावर असताना मी राज्यभवनात रबर स्टॅंप बनून राहू शकणार नाही,” असा इशारा पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममता सरकारला दिला आहे. तसेच आपण कोणत्या एका पक्षाची बाजू मांडत नसून घटनेच्या चौकटीत राहून आपले कर्तव्य पार पाडत असल्याचेही राज्यपाल धनखड म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी भाजपचे राष्ट्राचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर कोलकाता पासून दिल्लीपर्यंतच राजकारण तापले आहे. याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडून अहवाल मागितला होता. अहवाल प्राप्त होताच केंद्राने तात्काळ बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना बोलावणे पाठवले असून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्यपाल धनखड यांनी सांगितलं की, “मी सर्वाना सकाळी ८ वाजताच्या सुमारास कार्यक्रमाची माहिती दिली होती. मला १९ मिनिटानंतर ८ वाजून १९ मिनिटांनी मुख्य सचिवांचा निरोप मिळाला. मी डीजीपींना माहिती दिल्याचे त्यांनी म्हटलं. त्यानंतर अर्ध्या तासात ही हिंसक घटना घडल्याची माहिती मिळाली. त्यावेळी राज्यपालांनी राज्य प्रशासनाकडे बोट दाखवत राज्याच्या प्रशासनाने व्यवस्थित काम केले नाही, असे म्हणाले. ममता बॅनर्जी यांनी राज्यघटनेचे पालन करावे. जेव्हा त्या राज्यघटनेचे पालन करत नाही तेव्हा मला यात पडावे लागते. लोकशाही निशाण्यावर असताना मी राजभवनात रबर स्टॅंप बनून राहू शकणार नाही.”
तत्पूर्वी, वार्ताहरांना बोलताना राज्यपालांना धनखड यांनी म्हटलं की, राज्यात कायदा सुव्यवस्थेची हालत नीट असून, बंगालची सुरक्षा करणे माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी संविधानाचे पालन करावे. कालच्या घटनेबाबत ममता बॅनर्जींनी माफी मागायला हवी. मानवाधिकाराच्या दिवशी मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात आले. हा हल्ला लोकशाहीवरील डाग आहे. लोकशाहीत सर्वाना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे.
ममता यांनी संविधानाचे पालन करावे, जर तसे झाले नाही तर माझा रोल सुरु होणार आहे, असे म्हणत राज्यात कोण बाहेरचा आणि कोण आतला असे वक्तव्य ममतांनी करुन आगीशी खेळू नये, असा इशाराच राज्यपाल धनखड यांनी दिला.