मुंबई बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीशी कॉंग्रेसच्या नेत्यांशी कोणतीही अधिकृत बोलणी झाली नाही. त्यांच्या बातम्या फक्त मिडीयाच्या माध्यमातून आलेल्या आहेत. राज्यातील जनतेचे हित पाहायचे असेल तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत यावे. वंचितच्या माध्यमातून आम्ही कॉंग्रेसला ४० जागा द्यायला तयार आहोत. तयारी असेल तर येत्या १० दिवसात कॉंग्रेसने संपर्क साधावा आणि बोलणी करावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी केले.
बुधवारी दुपारी मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महासचिव गोपीचंद पडळकर, पार्लमेंट्री बोर्डचे सदस्य ऍड.आण्णाराव पाटील, वर्किंग कमिटीचे सदस्य ऍड. अंजारिया, डॉ. अरुण सावंत हे उपस्थित होते.
आजपर्यंत वंचितांचा कॉंग्रेसने वापर करू घेतला आहे. त्याआधारावरच कॉंग्रेसने ७० वर्षे सत्ता भोगली आहे. वंचितला बदनाम करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेसला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ४० जागा द्यायला आम्ही तयार आहोत. कॉंग्रेस तयार असेल तर त्यांनी वंचितच्या अधिकृत नेत्याशी चर्चा करावी. वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांमधून येणाऱ्या बातम्यांमधून वंचित तयार नसल्याचीं वृत्तं येत आहेत. आम्ही हा प्रस्ताव ठेवत आहोत. यावर काही चर्चा करावी. त्यांनी आपला प्रस्ताव मांडावा. असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
कॉंग्रेसने लोकसभा निवडणूकीत बदनाम केलं
कॉंग्रेस आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसला वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे अशी वक्तव्ये केली होती. वंचित बहुजन आघाडीसोबत जायला आम्ही तयार आहोत. परंतु त्यांच्याकडूनच अवास्तव मागणी करण्यात येत आहे. वंचित आमच्यासोबत यायला तयार नाही. असा प्रसार त्यांनी केला. राज्यात वंचितची चांगली स्थिती आहे. २०१४ आणि २०१९ ची परिस्थिती बदलली आहे. अनेक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते वंचितसोबत यायला तयार आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने वंचितबद्दल संभ्रम निर्माण करू नये म्हणून आम्ही हा प्रस्ताव दिला आहे. अन्यथा आम्ही २८८ जागा लढण्यास तयार आहोत.
वंचितमुळे सर्वजण हादरले आहेत
वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात सर्वजण हादरले आहेत. प्रस्थापितांच्या राजकारणाला वंचितमुळे धक्का बसला आहे. राज्यातील घराणेशाहीला धक्का बसला आहे. लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीला ४० लाख लोकांनी मतदान केले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमुळे सर्वजण हादरले आहेत. काही जण वंचितच्या संपर्कात आहेत. असे गोपीचंद पडळकर म्हणाले.