बहुजननामा ऑनलाइन – अनेक दिवसांपासून घडलेल्या राज्यातील सत्तानाट्यानंतरही भाजपा-शिवसेना यांच्यातील निर्माण झालेल्या तणाव अजूनही कमी होताना दिसत नाही. शिवसेनेनं साद दिली तर भाजपाची दारं आजही खुली आहे असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यावर भाषण केले आहे. आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका. दरवाजे जेव्हा उघडायचे तेव्हा उघडले नाही, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले होते, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘फडणवीसांच्या कोणत्याच वक्तव्याकडे गांभीर्याने पाहत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विरोधी पक्षाच्या अपेक्षा आहे. दरवाजे जेव्हा उघडायचे तेव्हा उघडले नाही, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले होते. आता वेळ निघून गेली आहे. आम्ही पुढे आलो आहोत. विरोधी पक्ष म्हणून चांगले काम करा. विरोधी पक्षाचा इतिहास पाहता काम चांगले करा.’
संजय राऊत पुढे म्हणाले की, आमचे उमेदवार पाडण्याचा भाजपाने प्रयत्न केला. बाळासाहेबांचे विचाक, अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी यांचे विचार आम्हाला माहित आहे. बाळासाहेबांचा फोटो लावूनच भाजपा वाढली. आम्ही स्वतंत्रपणे लढलो असतो तर १०० च्या वर जागा जिंकल्या असत्या. जी भूमिका मिळाली आहे ती निभवा.
त्याचसोबत ऑटो रिक्षा असो वा बैलगाडी सरकार असो, राज्य सरकार चालले आहे. बैलगाडीला कमी लेखू नका. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार कासवाच्या गतीने पुढे जाईल पण टप्पा पार करणार आहे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यावरही टीका केली जाते. भारत 5 वर्षात उभा राहिला नाही तर गेल्या 60 वर्षापासून देशात कॉंग्रेसचे योगदान आहे. पंडित नेहरू, महात्मा गांधी, वीर सावरकर यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. कोणावरही टीका करुन आपण मोठे होत नाही असे देखील संजय राऊत यांनी सांगितले.