बहुजननामा ऑनलाइन टीम – जनतेची नाडी जो चांगल्या प्रकारे ओळखतो तो कारभार चांगल्या पद्धतीने करतो याचा प्रत्यय त्यांच्या कामातून समोर येतो. (Satara Superintendent of Police)मग तो राजकीय पुढारी असो किंवा प्रशासक. यामुळे जनतेचे प्रश्न सुटण्यास देखील मदत होते. याच कार्यपद्धतीचा अवलंब सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडून अवलंबला जात असून याचा अनुभव अनेकांना आला आहे. सातारा शहरातील रस्त्यांवर वेश बदलून माणसांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेत ते पोलिसांच्या कार्यपद्धतीवर बारीक नजर ठेवत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास देणारे गुन्हेगार असो किंवा पोलीस यांना सावध रहा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा ही लोकशाहीतील महत्त्वाची दोन अंग आहेत. या दोघांच्या कार्यपद्धतीवरच सर्वसामान्य नागरिकांचे बहुतांश दैनंदिन जीवन कसे राहील, हे अवलंबून असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये त्यांच्या समस्या सोडवल्या जाव्यात ही जबाबदारी त्यांच्यावर असते. आतापर्यंत अनेक राज्यकर्ते तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या कार्यपद्धतीमुळे ते नावजाले गेल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज देखील वेश बदलून आपल्या रयतेमध्ये फिरत असल्याचे अनेक दाखल्यांमधून सांगितले गेले आहे. याची पुनरावृत्ती साताऱ्यात होताना दिसत आहे.
पोलिस अधीक्षक हा जिल्ह्याच्या प्रशासनातील महत्त्वाचा अधिकारी असतो. त्याला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची अती जोखमीची जबाबदारी त्याच्यावर असते. यासाठी त्यांच्याकडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी कुमक असते. मात्र, ती प्रमुख अधिकाऱ्याच्या विचाराशी, त्याने निर्देशांशी सुसंगत चालली तर कायद्याचे राज्य निर्माण होते. आजपर्यंत आलेले पोलीस अधीक्षक आपापल्या परीने काम करत होते. मात्र, वेश बदलून लोकांमध्ये मिसळून परिस्थिती जाणून घेण्याचे काम सध्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे करत आहेत. त्यांच्या या अनोख्या कार्यपद्धतीची प्रचिती साताऱ्यातील अनेकांना आली आहे. स्वत: पोलीस अधीक्षक आपल्यात मिसळून आपली कामे करत असल्याचे पाहून सातारकरांना सुखद धक्का बसत आहे.
मीच त्यांच्या जागी आलोय, प्रवाशाला पहाटे सुखद धक्का
साताऱ्यात राहणारा एक व्यक्ती पहाटे सव्वादोनच्या सुमारास सातारा एसटी बसस्थानकावर उतरला. रात्री रिक्षा चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जाते याची कल्पना त्या व्यक्तीला होती. त्यामुळे त्याने रिक्षा न करता पायी जाण्याचा निर्णय घेतला. हा व्यक्ती पायी चालत जात असताना रस्त्याच्या कडेला काही लोक शेकोटी पेटवून शेकत बसली होती. त्यांच्या शेजारी एक व्यक्ती त्यांच्यातलाच होऊन त्यांच्यासोबत गप्पा मारत बसला होता. चालत जाणाऱ्या व्यक्तीला पाहून त्याने कुठे जायचे असल्याचे विचारले. त्यानंतर चला मी तुम्हाला घरी सोडतो असे म्हणत चालत जाणाऱ्या व्यक्तीला आपल्या बुलेटवर बसवले.
बुलेटवर जात असताना पाठिमागे बसलेल्या व्यक्तीची सर्व माहिती जाणून घेतली. त्याला घराजवळ सोडले. बोलण्याच्या ओघात शेवटी मला सातपुते मॅडमला भेटायचे होते, असे त्या सातारकराने सांगितले. त्यावेळी त्यांची बदली झाली आहे. मीच त्यांच्या जागी आलोय, असे बुलेट चालवणाऱ्या व्यक्ती सांगितले. त्यावेळी खुद्द जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकच आपल्याला घरापर्यंत सोडवण्यासाठी आले असल्याचे समजता त्या व्यक्तीला पहाटे सुखद धक्का बसला. अधीक्षकांच्या या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेत नक्कीच फरक पडेल.