बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या भयावह काळात अनोळखी वाहनात बसण्यास कोणी धजावत नाही अन त्यातून रिक्षा चालकांची पोट न भरणारी “कमाई”देखील होईनाशी झाली आहे. पण अश्या कठीण काळात देखील एका रिक्षा चालकाचे सर्वत्र कौतुक होत असून, रिक्षात विसरलेले 11 तोळे दागिने आणि 20 हजाराची रोकड त्या रिक्षा चालकाने परत केली आहे. त्याच्या या प्रामाणिक पणामुळे त्याचा पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.
विठ्ठल मापारे (वय ६०, रा. घोरपडी) असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यांच्यामुळे प्रवाशी मेहबूब शेख (वय ६३) व पत्नी शहनाज शेख (वय ५३) यांना जवळपास ७ लाखांचे दागिने परत मिळाले आहेत.
मापारे हे घोरपडी येथील आदर्श पार्क परिसरात राहण्यास आहेत. ते रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. दरम्यान केशवनगरमधील लोणकर वस्तीतील शेख दाम्पत्य बुधवारी विठ्ठल मापारे यांच्या रिक्षातून (एम एच १२ एन.डब्ल्यू ३५०५) गाडीतळ बसस्टॉप येथे उतरले होते. त्यानंतर रिक्षाचालक विठ्ठल पुन्हा बी. टी. कवडे येथील रिक्षा स्टॅडला लावून चहा पिण्यासाठी गेले. माघारी आल्यानंतर त्यांना रिक्षात प्रवाशाची बॅग राहिल्याचे दिसली. त्यांनी स्टॅण्डवरील रिक्षाचालकांना बॅगची माहिती दिली. त्यावेळी मित्रांनी त्यांना बॅग उघडून तर पाहू असे म्हटले. मात्र, तब्बल २५ वर्षांपासून रिक्षाचालविणाऱ्या मापारे यांनी बॅग उघडण्यास नकार दिला. रिक्षा थेट घोरपडी पोलिस चौकी नेउन त्यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली. बॅग ताब्यात घेउन हडपसर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर बॅगची तपासणी केली. त्यात तब्बल ११ तोळे सोन्याचे दागिने आणि २० हजारांची रोकड मिळून आली. तोपर्यंत पोलिसांनी तक्रारदाराची माहिती काढून शेख दाम्पत्याला पोलीस चौकीत बोलावून घेतले. त्यांची हरवलेली बॅग सर्व मुद्देमालासह परत करण्यात आली. सोने, चांदी व पैशासह बॅग परत मिळाल्याने शेख दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रामाणिकपणामुळे रिक्षचालक विठ्ठल मापारे यांचा पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय कदम, सहायक पोलिस फौजदार निसार शेख उपस्थित होते.