शिरूर : बहुजननामा ऑनलाईन – भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघा कामगारांचा जागीच मृत्यू झाला. रांजणगाव एमआयडीसीतील (ता. शिरुर) ‘मुरली कृष्णा फार्मा’ कंपनीसमोरील चौकात शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी टेम्पोचालकास रांजणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
किरण माणिक गिरमकर (वय 27 रा. उरळगाव, ता. शिरूर, जि. पुणे) आणि रविंद्र अशोक भंडलकर (वय 34, रा. टाकळी भीमा, ता. शिरूर, जि. पुणे) अशी या अपघातात ठार झालेल्या कामगारांची नावे आहेत. ते दोघेही रांजणगाव एमआयडीसीतील सी व्हेरॉक आणि इतर दोन कंपन्यांत सुपरवायझर म्हणून काम पाहात होते. तर प्रसाद सुनिल कातोरे (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, मूळ रा. राहुरी, जि. नगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे.
रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी व्हेरॉक कंपनीतील काम संपवून ते दोघेही गिरमकर यांच्या दुचाकीवरून ( एमएच 12 एलक्यू 1547) दुस-या एका कंपनीत चालले होते. एमआयडीसीतीलच मुरली कृष्णा कंपनीसमोरील चौकातून ते जात असताना दुसऱ्या बाजूने भरधाव जाणा-या टेम्पोने ( एमएच 12 आरएन 9606 ) दुचाकीला जबर धडक दिली. यामुळे दोघेही चौकातील दुभाजकावर जाऊन आदळले. यात दोघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून पळून गेला होता. परंतु स्थानिकांनी याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी रांजणगाव गणपतीजवळ हा टेम्पो पकडला. हयगयीने टेम्पो चालवून अपघात केल्याप्रकरणी टेम्पोचालक प्रसाद सुनिल कातोरे यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. यु. येळे करीत आहेत.
दरम्यान या अपघाताच्या घटनेनंतर रांजणगाव एमआयडीसीतील वाढत्या वाहनांचा, बेशिस्त वाहतुकीचा आणि एकूणच खबरदारीच्या अभावाचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.