बहुजननामा ऑनलाइन टीम –पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून पतीने पत्नीला मोबाईलवरुन ट्रिपल तलाक दिल्याची घटना भिवंडी शहरात घडली आहे. याबाबत पीडित महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शास्त्रीनगर भागातील 24 वर्षीय पीडित महिला पती खालिद जावेद शेख यासोबत राहत होती. 29 ऑगस्टला पत्नी भिवंडी शहरातीलच गैबीनगर औलिया मशीद परिसरातील माहेरी गेली होती. त्यावेळी पती घरी आल्यावर त्याला पत्नी दिसून न आल्याने त्याने तिला फोन केला. तू आईच्या घरी का गेलीस याबाबत जाब विचारत शिवागाळ करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात पती खालिद शेख याने पत्नीस मोबाईलवरच मला तुझ्यासोबत रहायचे नसून मी तुला या क्षणी तलाक देत असल्याचे सांगितले. या प्रकरणी पत्नीने शांतीनगर पोलीस ठाण्यात पती खालिद शेख याच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी खालिद शेख विरोधात मुस्लीम स्त्रीयांच्या लग्नाच्या हक्कांचे संरक्षण अध्यादेशच्या कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.