बहुजननामा ऑनलाईन
भारतीय जनता पक्षाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून नवा दहशतवाद फोफावला आहे. भाडोत्री आयटी सेलच्या माध्यमातून रातोरात ट्विटर, फेसबुक अकाऊंट उघडून बदनामी किंवा अपप्रचाराची मोहिम राबवण्याचे उपद्व्याप सुरू आहेत. हा नवा दहशतवाद लोकशाही विरोधात रचलेला कटच आहे. या नव दहशतवादाचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे असं प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या सोशल मीडिया रॅकेटसंदर्भात सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली. शिष्टमंडळात पक्ष प्रवक्ते डॉ राजू वाघमारे, रत्नाकर सिंग उपस्थि होते. या बदनामी मोहिमेचा ट्विटरवरून मिळालेला डेटा पुढील तपासासाठी पोलिसांकडे देण्यात आला आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीत या कंपन्यांची नावं सोशल मीडियावरील खरे व फेक अकाऊंट्सची माहिती आहे. याची चौकशी करू असं आश्वासन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिलं आहे असं सावंत म्हणाले आहेत.
https://twitter.com/sachin_
सचिन सावंत म्हणाले, “भाजपनं सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांची बदनामी करण्याची, त्यांची प्रतिमा मलीन करण्याची मोहिम पद्धतशीरपणे चालवण्याचा नवा ट्रेंड आणला असून हा नव दहशतवाद आहे. याच माध्यमातून रातोरात हजारो ट्विटर, फेसबुक अकाऊंट उघडून बदनामीची मोहिम राबवली जाते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही याच रॅकेटचा वापर करण्यात आला आहे. या ट्विटची वर्तनात्मक पद्धत, इतिहास, त्यांचे ट्विट आणि रिट्विट पाहिल्यास असं दिसतं की, महाराष्ट्र सरकार विरोधात विचारपूर्वक व नियोजित कट कारस्थान आहे” असा आरोपही सावंत यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलीन करण्यासाठी काही व्यावसायिक एजन्सींच्या मार्फत हे करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री हे आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठीच मुंबई पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत असं चित्र रंगवण्याचा या मोहिमेचा एकमेव उद्देश होता असंही सावंत म्हणाले आहेत.
भाजपच्या या नव दहशतवादाचा काँग्रेसनं भांडाफोड करून यामागील खरा मास्टरमाईंड शोधण्यासाठी एसआयटीची स्थापना करून सोशल मीडियाचं रॅकेट उध्वस्त करावं अशी मागणी केली होती. मुबंई पोलिसांनीही तपास करत अशा 80 हजार बोगस अकाऊट्सच्या माध्यमातून बदनामीची मोहिम राबवल्याचं उघड केलं आहे. मिशीगन विद्यापीठानंही अशा मोहिमेत भाजपचा हात असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. फेसबुक आणि भाजपच्या अभद्र युतीचा पर्दाफाशही वॉल स्ट्रीट जर्नलनं उघड केला होता. भविष्यात अशाच पद्धतीनं हे उपद्व्याप करून समाजात अशांतता पसरवली जाऊ शकते. तसंच विरोधी पक्षांची सरकारं अस्थिर करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो अशी भीतीही सावंत यांनी व्यक्त केली आहे.