कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यातील संघर्ष पेटला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावरील झालेल्या हल्ल्याने पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तणावाचे झाले आहे. भाजपा-टीएमसी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आता टीएमसीच्या नेते पंचायत राज आणि ग्रामविकास मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी आयोजित केलेल्या एका सभेत भाजपावर गंभीर आरोप केला आहे. जर आगामी विधानसभा निवडणूक भाजपा जिंकली नाही तर गुप्तपणे लोकांना पाठवून ममता बॅनर्जी यांची हत्या करू शकते, असा आरोप त्यांनी केला आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गुरुवारी पश्चिम बंगाल दौऱ्यावर आले होते त्यावेळी नड्डा तसेच भाजपनेते कैलास विजयवर्गिय हे ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात डायमंड हार्बरमध्ये जात होते. त्यावेळी ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे दगड फेकले होते. या हल्ल्यातून नड्डा यांची कार बुलेटप्रूफ असल्याने वाचली होती. मात्र, विजयवर्गीय यांच्या कारचा काचा फोडून हे दगड आतमध्ये घुसले होते. विजयवर्गीय यांनी हे दगड हातांनी थोपवत स्वत:ला वाचविले होते. यामध्ये त्यांना दुखापत झाली होती. दगडफेकीच्या घटनेला केंद्र सरकारने गंभीरपणे घेतले असून राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्याकडून अहवाल मागविला होता. धनखड यांचा अहवाल मिळताच केंद्राने तातडीने बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना दिल्लीला बोलवून घेतले असून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत.
भाजपा कार्यकर्त्याचा हल्ल्यात मृत्यू
उत्तर २४ परगना येथील हलिशहरमध्ये भाजपचे डोर टू डोर कॅम्पेन करणारे कार्यकर्ते सैकत भवाल यांची निर्घृण हत्या केली, तर ६ जण गंभीर जखमी झाले. या हत्येमागे टीएमसीचे गुंड असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यासंदर्भात भाजपने एक ट्विट केले असून त्यात आणखी एक दिवस, आणखी एक हत्या. असे म्हंटले आहे. भवाल यांची हत्या टीएमसीच्याच गुंडानी केली असल्याचे म्हंटले आहे.