यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – आजच्या काळात सामाजिक विषमता टोकाला पोहोचली आहे. जगाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचे खऱ्याअर्थाने आज गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. अमोल मिटकरी यांनी केले. राळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्यावतीने आयोजित धम्म परिषदेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर भगत होते. उद्घाटक म्हणून अंकुश मुनेश्वर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माला खसाळे, विनय मुनोत उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना मिटकरी म्हणाले की, या जगातील पहिली क्रांती भगवान गौतम बुद्धाने केली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला न्याय देऊन दिशा दाखविण्याचे काम केले. जो देश संविधानाने चालतो ते संविधान जाळण्याची भाषा व प्रयत्न करणाऱ्या देशद्रोह्यांना धडा शिकविण्याची वेळ आता आली आहे, असे ते म्हणाले. यावेळी किशोर भगत यांनी अध्यक्षीय भाषण केले. तिसऱ्या सत्रात संविधान मनोहरे यांच्या बुद्ध-भीम गीतांच्या सदाबहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गोवर्धन वाघमारे, दीपक आटे, जगन नगराळे, सुधाकर लोहवे,भास्कर वाघमारे,अरविंद तामगाडगे यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती सदस्य व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.