बहुजननामा ऑनलाईन टीम : कोरोनामुळे परीक्षा न देताच 10वीची सर्व विद्यार्थी पास करण्याचा निर्णय तेलंगाना सरकारने घेतला आहे. राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला. कोरोनामुळे राज्यात एवढ्या मुलांची परीक्षा घेता येणार नाही असे सरकारने सांगितले आहे. त्यामुळे सर्व मुलांना ग्रेड देऊन त्यांना पुढच्या वर्गात पाठवले जाणार आहे. वर्षभरातल्या मुलांच्या प्रगतीवर त्यांना ग्रेड देण्यात येणार आहे.
तेलंगानात आजपासून 10वीची परीक्षा सुरू होणार होती. मात्र हायकोर्टाने कोरोनामुळे परीक्षा घेण्याला स्थगिती दिली होती.
देशातल्या अनेक राज्यांमध्येही असाच प्रश्न निर्माण झाला असून फक्त फायनलमध्ये असणार्या मुलांचीच परीक्षा कशा पद्धतीने घेता येईल यावर विचार सुरू आहे. अनलॉक 1 नंतर देशातील अनेक ठिकाणी जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या महासाथीत 16 मार्चपासून देशातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. ऑगस्ट 2020 नंतर शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तब्बल 33 कोटी विद्यार्थी शाळा केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत. पालक व शिक्षकांसोबत झालेल्या चर्चेनंतर एचआरडी मंत्री रमेश निशंक पोखरिया यांनी शाळा आणि महाविद्यालये ऑगस्टनंतर पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यातही 15 ऑगस्टनंतर शाळा व महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय 15 ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचा निकाल देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.