बहुजननामा ऑनलाइन टीम – अमेरिकेमध्ये कोरोनावरील जी लस तयार केली आहे, त्यात गायीचे रक्त वापरल्याचा खळबळजनक दावा हिंदू महासभेचे स्वामी च्रकपाणि (Hindu Mahasabhas Swami Charakpani ) यांनी केला आहे. जर गायीचे रक्त आपल्या शरीरात गेले तर आपला धर्म भ्रष्ट होतो. जोपर्यंत कोरोनाच्या लसीमध्ये गायीच रक्त वापरलेल नाही, हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत अगदी जीव गेला तरी ही लस घेणार नाही, असे स्वामी चक्रपाणि यांनी म्हटले आहे. गायीच रक्त असणारी ही लस देशात वापरण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी स्वामीनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. याबाबतचे वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे.
… तो पर्यंत या लसीचा भारतात वापर नको ?
स्वामी चक्रपाणि यांनी केलेल्या निवेदनामध्ये जोपर्यंत करोनाची लस कशा पद्धतीने बनवण्यात आली आहे, हे स्पष्टपणे सांगितले जात नाही, ही लस एखाद्या व्यक्तीच्या धर्माविरोधात तर नाही हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत या लसीचा भारतात वापर केला जाऊ नये, असे म्हटले आहे. कोरोना संपला पाहिजे आणि लसही दिली पाहिजे. मात्र यासाठी आपला धर्म भ्रष्ट करता येणार नाही. जेव्हा कोणतीही कंपनी एखादं औषध बनवते तेव्हा त्यामध्ये काय आहे याची माहिती दिली जाते. मग करोनाच्या लसीसंदर्भातील माहिती का सार्वजनिकरित्या उपलब्ध करु दिली जात नाही.
गायीचे रक्त शरीरात गेल तर
सनातन धर्मामध्ये गायीला मातेसमान मानले गेले आहे. जर गायीचं रक्त आपल्या शरीरामध्ये गेले तर तो आपला धर्म भ्रष्ट करण्याचा प्रयत्न असेल. सनातन धर्माला संपवण्यासाठी अनेक वर्षांपासून असे कट रचले जात आहेत. त्यामुळेच करोनाची कोणतीही लस येत असेल तर आधी त्यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली जावी. जेव्हा सर्व शंका दूर होतील त्यानंतरच लसीकरण करावे असे ते म्हणाले.
पुढील महिन्यापासून भारतामध्ये करोनाच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्यातील सरकारांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरु झाली असून तयारीलाही सुरुवात झाली आहे. भारतामध्ये देण्यात येणारी लस ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे.