बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस विरूद्ध बिहार पोलीस असा वाद रंगला आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी वादात उडी घेतली आहे. यानंतर अभिनेत्री रेणुका शहाणे हिनं अमृता यांना चांगलंच सुनावलं आहे.
सुशांत आत्महत्या प्रकरणावरून ट्विट करत अमृता यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली होती. त्यांनी लिहलं होतं की, “सुशांत प्रकरणामुळं आता मुंबई शहर सुरक्षित राहिलं नाही. निष्पाप लोकांच्या बाबतीत इथं माणूसकी दाखवली जात नाही. मुंबईत स्वाभिमानी आणि साध्या लोकांचं जगणं सुरक्षित नाही” असं म्हणत अमृता यांनी वादाला तोंड फोडलं होतं.
रेणुका शहाणेनं अमृता यांच्या ट्विटचा समाचार घेत झापलं आहे. रेणुकानं लिहिलं की, “जिथं मुंबई शहरात लाखो लकांचे संसार चालतात, तिथं तुम्ही असं कसं म्हणू शकता. हे शहर लोकांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद देतं. इतकंच नाही तर कोणत्याही झेड सुरक्षेशिवाय हे शहर लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतं.” असा टोलाही तिनं लगावला आहे.
https://twitter.com/renukash/status/1290534933270679552
अमृता यांना आठवण करून देत रेणुकानं असंही लिहलं की, कोरोनाच्या परिस्थितीतही मुंबई पोलीस हे 24 तास आपल्या सर्वांची सुरक्षा करत आहेत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा राजकीय मुद्दा करून ट्विट करू नये. जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते आणि अशी घटना घडली असती तर तेव्हीही असंच ट्विट केलं असतं का? अशी टीकाही रेणुकानं केली.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणावर मीडिया आणि राजकारणी लोकांचा कोणताही दबाव असता कामा नये असंही मतही रेणुकानं व्यक्त केलं.
युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनीही अमृता यांच्यावर सडकून टीका केली आहे.