बहुजननामा ऑनलाईन टीम – रेल्वेप्रवासात चोरीला गेलेली चैन तब्बल 21 वर्षांनी एका महिलेला मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. विरारच्या राजश्री सुनील करजावकर यांना आर्श्चयाचा धक्का बसला आहे. विरार पूर्व द्वारका नगरी, फुलपाडा रोड या परिसरात राहणार्य करजावकर यांची तब्बल 21 वर्षाआधी ट्रेनच्या गर्दीत चोरलेली चैन पोलिसांनी घरी आणून दिली.
राजश्री करजावकर 1999 साली कामानिमित्त अंधेरीला आल्या होत्या. लोकलमध्ये चढताना त्याची 4 ग्रॅमची कानातील चैन चोरुन चोराने पळ काढला होता. यात वांद्रे रेल्वे पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. पोलिसांनी याचा सखोल तपास करून, चोराला पकडून त्याच्याकडून राजश्री यांची सोन्याची चैन मिळवली. वांद्रे पोलिसांनी राजश्री करजावकर यांना त्यांच्या राहत्या घरी येऊन तब्बल 21 वर्षानंतर कानातील चैन त्यांच्या स्वाधीन केली.
राजश्री यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे. त्यांचा मुलगा प्रथमेश करजगावकर याने फेसबुक पोस्ट करत रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहेत. 1999 साली आईचे रेल्वेत चोरी झालेले दागिने आज तब्बल 21 वर्षांनी परत मिळाले. गणपतीच्या पूर्वसंध्येलादागिने मिळाल्याची खुशखबर रेल्वे पोलिसांकडून मिळाली होती. कायदेशीर प्रक्रियेनंतर अखेर आज पोलिसांनी दागिने घरपोच केले. रेल्वेत एखादी गोष्ट चोरीला गेली की ती परत मिळण्याची शक्यता फार कमी असते. मात्र जीआरपीमध्ये आजही अनेक पोलिस एखाद्या गुन्ह्याचा प्रामाणिकपणे तपास केल्याचे प्रथमेशने म्हटले आहे.