बहुजननामा ऑनलाइन टीम – भंडारा जिल्ह्या रुग्णालयातील ‘शिशु केअर’ कक्षाला लागलेल्या आगीनंतर राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयाचे ऑडिट करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (fire audit )दिले आहेत. त्यातच आता वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री. विठ्ठल मंदिराचे मागील दोन वर्षांपासून फायर ऑडिटच झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आषाढी, कार्तिकी यांसारख्या मोठ्या तर चैत्र, माघ लहान यात्रेनिमित्त प्रतिवर्षी मंदिरात लाखो भाविकांची ये-जा असते. मंदिरातील वास्तूंमध्ये वातानुकूलित यंत्रणा, अस्तावस्त वायरिंगचे जाळे पसरल्याने मंदिरात आगीच्या धोक्याची शक्यता आहे. तसेच मंदिरातच देवाचे किचन असल्याने दरवर्षी मंदिराचे फायर ऑडिट करुन त्यातील त्रुटी दूर करणे गरजेचे असताना, सन २०१८ पासून मंदिर समितीने फायर ऑडिट करुन न घेतल्याची बाब उघडकीस आली आहे.
सध्या श्री. विठ्ठल मंदिरात असणारे वायरिंग अतिशय धोकादायक असून ते सभामंडपाच्या जवळून नेण्यात आले आहे. त्याच्या शेजारुनच दर्शनाची रांग मंदिराच्या छतावरून जाते. मंदिर परिसरात असणारे सात मजली दर्शन मंडप अत्यंत चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला आहे. तसेच श्री. विठ्ठल मंदिराचा DPR पुरातत्व विभागाच्या सल्ल्याने बनवून घेण्याचे काम सुरु आहे. तर इन्फ्रा रेड कॅमेराच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी मंदिराच्या वास्तूची तपासणी सुद्धा केली आहे.
दरम्यान, श्री. विठ्ठल मंदिराची मूळ वास्तू अकराव्या शतकातील आहे. तथापि, अशी पुरातन आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मंदिरांबद्दल गांभीर्याने काळजी घेण्याची गरज असताना, गेल्या दोन वर्षांपासून मंदिर समितीने फायर ऑडिट न करणे हा गंभीर प्रकार आहे.