पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी कोणतेही पुरावे न देता पत्रात 100 कोटीचा उल्लेख केला आहे. या प्रकाराची कल्पना होती तर त्यांनी त्यावेळी कारवाई का केली नाही ? असा सवाल उपस्थित करत खंडणीखोरीला पाठीशी घालणाराच सहआरोपी असतो. त्यांनाच सहआरोपी करुन चौकशी करा, अशी भूमिका माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडेंनी घेतली आहे. तसेच सिंग यांची वर्तणूक ठीक नसल्याचा आरोप करत खोपडे म्हणाले की, परमबीर सिंग या व्यक्तीने 143 अधिका-यांचे करिअर बरबाद केले आहे. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवून कारवाई केली, लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारमध्ये फेरफार केले. तर हा लोकशाहीचा पराभव ठरेल. त्यामुळेच सिंग यांच्या अर्जाची सखोल चौकशी करावी, असे खोपडे यांनी म्हटले आहे
परमबीर सिंग यांच्या पत्रावरून राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. भाजपाकडून गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर खोपडे म्हणाले की, एखाद्या राजकीय पुढाऱ्याने लिहावे असे पत्र परमबीर सिंगांनी लिहले आहे. सहआरोपी म्हणून त्यांच्यावर खटला भरावा इतक्या चुकीच्या पद्धतीने लिहलेले हे पत्र आहे. तो सिंह यांच्या विरोधातील पुरावा होऊ शकतो. त्यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्यापेक्षा परमबीर सिंग यांची सखोल चौकशी करावी, असे खोपडे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, स्वतःच्या हद्दीत असणाऱ्या पोलीस सहकाऱ्याला पैसे गोळा करण्याचे आदेश दिले जातात, असे चुकीच्या पद्धतीने लिहिण्याची अपेक्षा आयपीएस अधिकाऱ्याकडून नाही. राज्यात कोणीही पोलीस अधिकारी धुतल्या तांदळासारखा नाही. सिंग यांच्या पत्रात 100 कोटीचा उल्लेख केला आहे, त्यावर विश्वास ठेवू नये. वाझे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याचे कृत्य आणि बेजबाबदार सिंह यांचे पत्र म्हणजे महाराष्ट्र पोलीस नव्हे. राज्यातील आयपीएस अधिकारी स्वार्थी असतात, असे स्पष्ट करणारी सिंह यांची भूमिका वाटते. त्यांच्या वागण्यातून महाराष्ट्र पोलिसांचा कमकुवतपणा दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे शासनाला अशा आयपीएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत विचार करावा लागेल, असे खोपडे यांनी म्हटले आहे.