हुपरी/कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – चांदी उद्योगामध्ये काम करणाऱ्या कारागीर (रोजंदारी मजूर) व चांदी उद्योजक यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता या कारागिरांना जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल अर्थात जीजेईपीसी (GJEPC) या भारत सरकारच्या स्थापित संस्थेकडून ओळखपत्र (Identity Card) आणि विमा (Insurance) संरक्षण देण्यात येणार आहे. कोरोना काळामध्ये जीजेईपीसीने चांदी कारागिरांना मदत म्हणून प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत केली होती. चांदी उद्योगामध्ये पहिल्यांदाच कारागिरांना ओळखपत्र आणि विमा संरक्षणाचा लाभ दिला जात आहे. कारागिरांना शासकीय मदतीचा लाभ मिळू लागला असून आता ओळखपत्र आणि विमा योजनेची संधी उपलब्ध झाली आहे.
जीजेईपीसी ही भारत सरकार स्थापित संस्था असून सोने, चांदी व हिरे उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. ज्यांच्याकडे या संस्थेचे ओळखपत्र असेल अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या संस्थेने आता चांदी उद्योगात काम करणाऱ्यांसाठी ओळखपत्र स्वास्थ्य विमा अशा आणि दोन योजना आणल्या आहेत.
जीजेईपीसीने ओळखपत्र देण्याच्या निर्णयामुळे देशभरात कुठेही व्यापार करण्यासाठी चांदी कारागीर, उद्योजकांना मोठा फायदा होणार आहे. चांदीचे दागिने किंवा चांदी घेऊन जाताना पोलिसांनी संशयावरुन पकडल्यास त्या उद्योजकाची ओळख पटवण्याचे काम जीजेईपीसी करणार आहे. विमा संरक्षण योजने अंतर्गत ओळखपत्र प्राप्त झाल्याबरोबर रोजंदारी कारागीर व त्याच्या कुटुंबाचा आरोग्य विमा उतरवला जाणार आहे. विम्याची 75 टक्के रक्कम संस्था भरणार आहे तर 25 टक्के रक्कम संबंधित व्यक्तीला भरावी लागणार आहे.
ऑनलाइन माहिती भरणे गरजेचे
ओळखपत्र मिळवण्यासाठी https://www.gjepc.org/parichay-card. या लिंकवर जाऊन संबंधित व्यक्तीला आपली संपूर्ण माहिती ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. स्वास्थ्य विमा योजनेतून लाभार्थ्यास वर्षभरात एक लाख रुपयापर्यंतचा दवाखान्याचा खर्च मिळणार आहे. यामध्ये बाळंतपण, सिजरिंग, कोरोना, मुतखडा, मोतीबिंदू इत्यादी आजारांचा समावेश करण्यात आला आहे.
खात्री झाल्यानंतरच ओळखपत्र
कारागिरांना लाभ घेण्यासाठी ते चांदी व्यवसायाशी संलग्न संस्थेचे सभासद असणे गरजेचे आहे. ऑनलाईन माहिती भरल्यानंतर अर्जदार चांदी उद्योजक किंवा कारागीर आहे का ? याची खात्री केली जाणार आहे. खात्री झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला त्याने रजिस्टर केलेल्या मोबाइलवर ओळखपत्र तयार झाल्याचा संदेश येतो. हुपरी परिसरातील चांदी उद्योगाला वाहून घेतलेल्या सामाजिक संस्थांनी सभासदांना ओळखपत्र व स्वास्थ्य विमा योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे चांदी उद्योजक मोहन खोत यांनी म्हटले आहे.