परभणी बहुजननामा ऑनलाईन – सोनपेठ तालुक्यातील मौजे नैकोटा येथील गावात बौद्ध समाजावर तेथील जातीयवाद्यांनी गेल्या पाच दिवसांपासून दवंडी देऊन सामूहिक बहिष्कार टाकला आहे. बौद्धांना पिण्याचे पाणी भरू न देणे ,तसेच गिरणीमध्ये दळण दळून न देणे, किराणा सामान न देणे, आटोमध्ये वरावास करू न देणे, महिलांना आणि पुरुषांना कामाला येऊ न देणे अशा प्रकारे बौद्धांना छळण्यात येत आहे. याप्रकरणी जातीयवाद्यांवर कठोर कारवाई करून अन्यायग्रस्त बौद्धांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाला अन्यायग्रस्त बौद्धांनी पीआरपीचे गौतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लेखी निवेदनाद्वारे केली आहे.परंतु अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे बौद्ध समाजात तीव्र नाराजी व संताप पसरला आहे.
सोनपेठपासून २० किमी अंतरावर असलेल्या मौजे नैकोटा गावात २८ एप्रिल रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक शांततामय वातावरणात काढण्यात आली होती. परंतु जातीयवाद्यांनी जाणीवपूर्वक जयंती मिरवणूक अडवून वाद घालण्यात आला. या प्रकरणी जातीयवादी बाबासाहेब साठे ,पांडुरंग साठे ,श्रीकिसन साठे ,तुळशीराम रेवले , राजेभाऊ साठे ,आश्रोबा साठे ,सोमेश्वर रेवले , यांच्या विरोधात सोनपेठ पोलीस स्टेशनमध्ये अट्रोसिटी दाखल करण्यात आली.
परंतु अट्रोसिटी दाखल केली म्हणून जातीयवाद्यांनी बौद्ध समाजाला वेठीस धरले आहे. जातीवादी इथेच थांबले नाहीत तर जाहीर दवंडी देत जर कुणी त्यांना पाणीपुरवठा केला तर त्यांना १० हजार रुपये दंड घोषित करण्यात आला आहे. यामुळे बौद्ध बांधवांमध्ये भीतीचे वातावरण असून अनेक जण गाव सोडून जाण्याच्या तयारीत आहे. म्हणून बौद्ध समाजाला संरक्षण मिळावे न्याय देण्याची मागणी बाबा प्रधाने ,अरविंद प्रधाने ,गौतम प्रधाने, बाळासाहेब आचार्य ,मारोती हरबडे ,सुनील प्रधाने आदींनी केली आहे.