मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात चालणाऱ्या अनेक घडामोडीवरून सत्ताधारी आणि विरोधक परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यावरूनच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. त्या पत्रावरून गृहमंत्री देशमुख पहिल्या दिवसापासून चौकशी करा असं सांगत आहेत, तर “चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, गृहमंत्री, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या, चौकशीआधी फाशी त्यांच्या राजवटीत किती लोकांना दिली हा तपशील त्यांनी जाहीर केला पाहिजे. विरोधी पक्षनेते मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली आहे.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी खरंच ते पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न निर्माण होतो की त्यांना कोणीतरी लिहून दिलं आणि त्यांनी सही केली असे राऊत म्हणाले, तर फडणवीस यांच्या मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही नीट सांभाळू शकले नाहीत. विरोधी पक्षनेत्याने त्या पदाची प्रतिष्ठा नष्ट होईल, कमी होईल असं वर्तन करु नये. शेवटी देशातील शोषित, पीडितांचा आवाज विरोधी पक्षनेता असतो, सरकार नसतं याचं भान प्रत्येत विरोधी पक्षनेत्याने ठेवलं पाहिजे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच ते पुढे म्हणाले, सतत राजीनाम्याची आणि राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी यामुळे विरोधी पक्षाचं हसू होतं, लोक त्यांना मूर्खात काढतात हे समजलं पाहिजे. आमच्यासाठी हा विषय संपला असून यावर आता अधिक चर्चा होता कामा नये. यामध्ये विशेष घडामोडी घडतील असं वाटत नाही,
दरम्यान, ते म्हणाले, काँग्रेसमध्ये नाराजी वैगेरे काही नाही. किंबहुना काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येत आहेत. युपीए अधिक मजबूत होण्यासाठी ही काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. सोनिया गांधीचीही तशी भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचं नेतृत्व खंबीरपणे केलं आहे, परंतु सध्या त्यांची प्रकृती चांगली नसते. भारतात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी युपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज युपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.
राऊतांची राज्यपालांवर टीका –
राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी पाठवून ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला. त्याबद्दल काय झालं याचे स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे. अभ्यास करत आहेत वैगेरे ठीक आहे, त्यातून त्यांना काही Ph.D. करायची आहे का? जी नावं पाठवली आहेत ती अधिकाधिक वेळ आपल्या मांडीखाली कशी दाबून ठेवता येतील याबाबत एखादा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करायचा आहे का असा सवाल करत त्यांनी टीका केली आहे.