मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढत आहे. कोरोनाचा विळखा रोखायचा असेल तर मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासह इतर नियमांचे पालन करणे गरजेेचे आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील ट्विट करून असाच एक संदेश नागरिकांना दिला आहे. सोशल डिस्टन्सिंगचं महत्व त्यांनी यातून पटवून दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, सोशल डिस्टन्सिंगची ताकद, योग्य काळजी हाच उपाय अशी कॅप्शन देत एक फोटो पोस्ट केला आहे.
ज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत नमूद केले आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये त्यांनी हे ट्वीट केले आहे. कोरोनाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रत्यक्षात सरकार, नेते मंडळी, एनजीओ, महापालिकेकडून जनजागृती केली जात आहे. यापूर्वी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील SMS अर्थात सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापरण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी एक ट्वीट सीरिज पोस्ट करत राज्यातील कोरोनाची भीषण परिस्थिती मांडली होती आणि नागरिकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान राज्यात 24 तासात 6100 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 44 जणांचा मृत्यू झाला आहे. 24 तासात आढळलेले नवीन कोरोना रुग्ण हे गेल्या 84 दिवसांतील सर्वाधिक रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासातील मृतांची आकडेवारी ही 15 दिवसातील सर्वाधिक आहे.