पुणे : बहुजननामा ऑनलाईन – आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे त्यांना त्यानिमित्ताने अभिष्टचिंतन करतो. शरद पवार हे शाहू महाराजांच्या विचाराचे पाईक आहेत. शाहू महाराजांचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर शरद पवार यांनी सारथी संस्था जिवंत ठेवणे आवश्यक आहे. लवकरच शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची भेट घेऊन शेवटची विनंती करणार असल्याचे छत्रपती संभाजी राजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर तारादूतांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला छत्रपती संभाजी राजे यांनी भेट देऊन चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, एका बाजूला सरकारने सारथी संस्थेला स्वायत्तता असल्याचे सांगत असून कलम 25 नुसार संचालक आम्हाला काहीच अधिकार नाहीत, सरकार निर्णय घेईल असे सांगत आहे. यावरून अद्याप ही या संस्थेला स्वायत्तता दिलेली नाही. सारथी संस्था जिवंत राहणे गरजेचे असून तारदूतांचे प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत. अन्यथा पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा ही छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी दिला.