बहुजननामा ऑनलाइन टीम – अनेक महिन्यांचे वेतन रखडल्याने एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. थकीत वेतन (Salary) तात्काळ न मिळाल्यास कर्मचारी संपाचे (strike) अस्त्र उगारतील असा इशारा इंटकचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. तसेच शिवसेनेच्या काळात खासगी कंत्राटदार आणल्याने एसटी महामंडळाची वाट लागली, असा(Sena era) आरोप छाजेड यांनी करत सरकारला(Sena era) घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार द्या, अन्यथा फौजदारी गुन्हा
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळी आधी दिले नाहीत तर आम्ही महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करु, असा इशारा देखील जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. छाजेड म्हणाले की, कोरोनाच्या काळात एसटी सेवा बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले. गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनच मिळाले नाही. कोरोना काळात काम करुनही एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही. त्यामुळे संसाराचा गाडा रेटायचा तरी कसा? हा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यात दिवाळी सण तोंडावर आला आहे, सण साजरा करायचा तरी कसा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. दरम्यान, एसटी कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही विनवणी केली होती. परंतु, अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. त्यामुळे आता कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार द्या, 1936 च्या कायद्यान्वये महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करु, अशी भूमिका इंटकने घेतली आहे.
‘एसटी बचाव-कामगार बचाव
मार्च ते ऑगस्ट या कालावधीत एसटी महामंडळाचं सुमारे 3,366 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे एसटीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर इंटककडून राज्यव्यापी अभियान राबवले. या अंतर्गत राज्यातील सर्व आमदार आणि खासदार यांना निवेदन देऊन, ‘एसटी बचाव-कामगार बचाव’ असे साकडे घातले होते.