नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाने हाहाकार उडालेला असतानाच केंद्र सरकारने म्हटले आहे की, ही वेळ अशी आहे की, लोकांनी आपल्या घराच्या आतसुद्धा मास्क घालण्यास सुरुवात करावी. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले की, जर घरात कुणी संक्रमित व्यक्ती असेल, तर त्याने मास्क घातला पाहिजे, जेणेकरून घरातील इतर लोक त्याच्यामुळे संक्रमित होऊ नयेत.
त्यांनी म्हटले की, मी तर सांगेन की आता वेळ आली आहे की, आपण सर्वांनी सामान्यपणे घराच्या आतसुद्धा मास्क घालण्यास सुरूवात करावी. आपण घराच्या बाहेर मास्क घालण्याबाबत बोलत होतो, परंतु संसर्ग ज्याप्रकारे पसरत आहे, ते पहाता जर आपण घराच्या आतसुद्धा कुणाजवळ बसलो असल्यास अशावेळी मास्क घालावा.
तर आरोग्य मंत्रालयाने कोविड प्रोटोकॉलवर जोर देत म्हटले की, संशोधनातून समजले आहे की सामाजिक अंतराचे पालन केले नाही तर एक व्यक्ती 30 दिवसात 406 लोकांना संक्रमित करू शकते.
सरकारने लोकांना आवाहन करत म्हटले की, कोविड-19 च्या सध्य स्थितीला लोकांनी घाबरू नये, विनाकारण घाबरल्याने फायद्याऐवजी नुकसान जास्त होते. अनेक लोक भीतीमुळे हॉस्पिटलमधील बेडवर ताबा मिळवून बसले आहेत, कृपया डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच दाखल व्हा.