सातारा : बहुजननामा ऑनलाइन – राज्य शासनाच्या ताब्यात असणारी गायरान व मुलकीपड आणि शेती विकास महामंडळाची जमीन मातंग समाज व इतर मागास समाजाला कसण्यासाठी तसेच इतर कामांसाठी मिळावी, या मागणीसाठी सत्यशोधक बहुजन न्याय हक्क परिषदेने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मातंग समाज अत्यंत मागासलेला आहे. या समाजाच्या वर्षानुवर्ष पिढ्यान्पिढ्या दारिद्रयात जात आहेत. शिक्षणापासून, सामाजिक कामापासून अनेक विकासापासून तो समाज वंचित आहे. या समाजाला दारिद्रयमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या ताब्यात असणाऱ्या शासकीय जमिनी द्याव्यात. महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असणारे गायरान मुलकीपड तसेच शेती विकास महामंडळ कार्पोरेशनची जमीन या समाजाला दिल्यास या समाजाचे आर्थिक मागासलेपण कमी होऊन तो विकासाच्या दृष्टीने वाटचाल करेल. केवळ देशाचा विकास होऊन चालणार नाही, त्याबरोबर देशातील मातंग समाज विकसित होण्याची गरज आहे. तेव्हाच देश पूर्ण विकसित झालेला दिसेल. यापूर्वीही या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करून मोर्चा, लॉंग मोर्चा, उपोषण, लाक्षणिक उपोषण केले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करीत आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
आंदोलनात दादा खवळे, अमोल इंगळे, अशोक बागवान, आप्पासाहेब मिसाळ, सदाशिव जाधव, दादा कुचेकर, यशवंत बागाव, मारुती कर्वे, रामचंद्र सकटे, अरुण खुडे, सविता देवकुळे, रोहिणी फाळके, शालन अहिवळे, लक्ष्मी लोंढे, अशोक कांबळे, आदी सहभागी झाले होते.