मुंबई: Sanjay Ruat On Chandrababu Naidu-Nitish Kumar | राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए च्या संसदीय पक्षाची बैठक जुन्या संसदेच्या (संविधान सदन) सेंट्रल हॉलमध्ये पार पडली. यामध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तिसऱ्यांदा एनडीएच्या (NDA) संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे.
राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, त्याला एनडीएच्या १३ घटक पक्षांनी पाठिंबा दिला. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी स्वागतपर भाषण केले. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला.
अमित शहा यांनी पाठिंबा दिला आणि नितीन गडकरींनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. जेडीएसचे अध्यक्ष कुमारस्वामी यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. दरम्यान आता देशात एनडीएचे सरकार बनणार असे निश्चित झाले असताना संजय राऊत यांच्या वक्त्यव्याची चांगलीच चर्चा होत आहे.
संजय राऊत म्हणाले, “नरेंद्र मोदी ९ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. मात्र, एनडीएचं सरकार चालवताना नरेंद्र मोदी यांचे नाकीनऊ येईल. मुळात एनडीएमध्ये आहेच कोण? नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू. आता हे दोघेही सर्वांचे आहेत. म्हणजे आज ते तुमच्याबरोबर आहेत. उद्या आमच्याबरोबर असतील.
आताच नितीश कुमार यांच्या पक्षाने मोदी सरकारच्या अग्निवीर भरतीला विरोध केला आहे. मोदींनी जे मुद्दे प्रचारात आणले होते, त्याला हे लोक विरोध करत आहेत. हे उद्या राम मंदिरालाही विरोध करतील. चंद्राबाबू नायडू हे म्हणत होते की, आम्ही सत्तेत आल्यानंतर मुस्लिमांना आरक्षण देणार, असे अनेक मुद्दे आहेत. त्यावर चर्चा होण्याची बाकी आहे.
पण खरं तर सरकार बनवण्याचा अधिकार हा इंडिया आघाडीचा आहे. कारण आम्ही सर्वांनी मिळून भाजपाला बहुमतापासून दूर ठेवलं आहे”, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे सरकारला इशाराच दिला आहे.