कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये ‘कमळ’ फुलविण्याची भाजपची महत्त्वकांक्षा तशी जुनीच आहे, मात्र सर्वार्थाने प्रयत्न करूनही त्या राज्यामध्ये शिरकाव करता येत नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काहीही करून ममता बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit shah) कोलकाता येथे दाखल झाले आहेत.
याबाबत भाजपचे महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, टीएमसीच्या अन्यायकारक सरकार आणि पक्षाच्या मनमानी नेतृत्वामुळे अनेक नेत्यांना मजबुरीने पक्षाला रामराम करावा लागत आहे. मोदिनीपूरमध्ये होणाऱ्या अमित शहा यांच्या रॅलीमध्ये तृणमुल काँग्रेस, सीपीएम, सीपीआय आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत. आगामी काळात भाजपाचं सरकार पश्चिम बंगालमध्ये येणार याचा विश्वास असल्याने हे सर्व भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र कोणाला पक्षात घ्यायचं हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय असेल असेही ते म्हणाले. टीएमसीचे मातब्बर नेते सुवेंदु अधिकारी, आमदार शीलभद्र दत्ता, बनश्री मैती पार्टी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तर आमदार मिहिर गोस्वामी यांनी आधीच भाजपात प्रवेश घेतला आहे. जिल्हास्तरीयपासून पंचायतस्तरीयपर्यंत हजारो कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे.
टीएमसीच्या नेत्यांना भाजपात घेण्यावरून वाद
एकीकडे टीएमसीचे नेते भाजपात सहभागी होत आहेत, तर दुसरीकडे भाजपा बाहेरच्या नेत्यांना घेण्यावरून मतभेद निर्माण होत असल्याचे चित्र आहे. टीएमसीचे नेते जितेंद्र तिवारी यांना भाजपात सहभागी करण्यावरून केंद्र सरकारमधील मंत्री बाबुल सुप्रियो यांनी सांगितले की, टीएमसीच्या अशा नेत्यांना भाजपात घ्यायला नको.
48 तासांत 9 आमदारांनी दिला राजीनामा
बंगाल कांथी मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार बनसरी मैती यांनी आपल्या पदाचा शुक्रवारी राजीनामा दिला आहे. दरम्यान, आज सकाळी पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस कबीरुल इस्लाम यांनीही आपला राजीनामा दिला आहे. गेल्या 48 तासांत 9 आमदारांनी राजीनामा दिला आहे. बनसरी मैती हे भाजपामध्ये जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधी जानेवारी 2021 पर्यंत 60-65 आमदार सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सोडतील, असे राज्यातील भाजपाचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांनी म्हटले होते.