मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदी मुळे सर्वाना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीमुळे प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क परत करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) दिले आहेत. UGC च्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोना महामारीचे संकट अद्यापही कायम असून, अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्ध्यात सोडण्याचा निर्णय घेत प्रवेश रद्द केले. परंतु, प्रवेश रद्द करताना शैक्षणिक संस्थांकडून त्यांना शुल्क कपात करुन राहिलेली रक्कम परत केली. याबद्दल UGC कडे विद्यार्थ्यांनी तक्रारी केलेल्या होत्या. बहुतांश वेळा हे प्रवेश खासगी, व्यावसायिक संस्थातील असतात. यामुळे एकूण शुल्काच्या काही टक्के रक्कम कपात करुन काहीच रक्कम विद्यार्थ्यांना परत केली जाते.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत UGC ने सांगितले की, “कोरोनादरम्यान पालक-विद्यार्थ्यांचे आणखी आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून ३० नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आलेल्या प्रवेशांवर कोणत्याही शैक्षणिक संस्थानी कोणतीही कपात न करता ते शुल्क परत करावे.”
एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम परत करावी
आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमातून साधारण अभ्यासक्रमांकडे जाण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने रद्द करण्यात आलेल्या प्रवेशांमुळे आर्थिक फटका बसू नये म्हणून डिसेंबरपर्यंत प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही एक हजार रुपयांपर्यंतची प्रक्रिया शुल्क कमी करुन बाकी सर्व शुल्क परत करावे, असे UGC कडून सांगण्यात आले.