बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अभिनेत्री कंगना रणावला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शंका उपस्थित केलीय. मुंबई आणि मुंबई पोलिसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे कंगनावर टीका केली जातेय.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अभिनेत्री कंगना राणावत सुरुवातीपासून वेगवेगळी वक्तव्य करतेय. सुरुवातीला बॉलिवूडमधील घराणेशाहीकडे बोट दाखवणारी कंगना रणावत कालांतराने राजकीय नेत्याच्या थाटात वक्तव्य करू लागलीय. राज्यातील ठाकरे सरकारवर ती टीका करत होती. तसेच मुंबई पोलिसांवर तिने अकार्यक्षमतेचे आरोप केले आहेत. गुंड आणि माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय, असंही वक्तव्य तिनं केलं होतं. त्यावरून तिच्यावर टीका केली जात आहे.
शिवसेना आणि मनसेने तिला आपल्या राज्यात जावे, असा सल्ला दिला होता. त्याचं निमित्त करून आपल्याला धमक्या येत आहे, असं कंगना म्हणत होती. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटतेय, असेही ती म्हणाली होती. त्यामुळे आणखी वातावरण तापले. शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानेही अभिनेत्री कंगना रणावतच्या वक्तव्याचा निषेध केलाय.
कंगना रणावतची बाजू घेऊन शिवसेनेवर टीका करणार्या केंद्रातील सत्ताधारी भाजपने आता थेट कंगनाला ’वाय’ दर्जाची सुरक्षा देण्याची घोषणा केलीय. तिला दिलेल्या सुरक्षेवरून आता उलटसुलट चर्चा सुरूय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत शंका व्यक्त केलीय.
’मुंबईविरोधात बोलणार्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली गेली आहे. करोना, बेकारी आणि आर्थिक संकटावरून लक्ष हटवण्यासाठी तू बोलत रहा, आम्ही तुला सुरक्षा पुरवू’, असे तर सत्ताधारी पक्षाला सुचवायचं नाही ना?, अशी शंका रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. दिशाभूल करणार्या अशा ड्रामेबाजांना महत्त्व न देता दुर्लक्ष केलेलं बरं. ही सुरक्षा फुकट नसेल, अशी अपेक्षा देखील रोहित पवार यांनी व्यक्त केलीय.