पाटणा : वृत्तसंस्था – तेजस्वी यादव यांनी आरजेडीच्या उमेदवारांना संदेश पाठवला आहे. आपल्या संदेशात तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे की, 10 तारखेला जेव्हा निकाल समोर येतील तेव्हा राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार अतिशय साधेपणाचे दर्शन घडवतील.
तेजस्वी यांनी म्हटले की, निकालानंतर उमेदवार आपल्या मतदारसंघात मिरवणूक काढणार नाहीत. विजयाचा जल्लोष जनता साजरा करेल. उमेदवार निकालाच्या वेळी आपल्या मतदारसंघात राहतील आणि आपले सर्टिफिकेट घेतल्यानंतर पाटणाकडे निघतील.
उमेदवारांना सांगण्यात आले आहे की, कोणताही असा प्रकार करू नये जेणेकरून लोकांना असुविधा निर्माण होईल. उमेदवारांपर्यंत हा संदेश पोहचवण्यासाठी 4 लोकांची टीम बनवण्यात आली आहे, ज्यामध्ये सुनील सिंह, संजय यादव, श्याम रजक आणि जगदानंद सिंह यांचा समावेश आहे.
दरम्यान, विजयाची चाहूल लागताच पाटणाच्या आरजेडी कार्यालयात साफसफाई सुरू झाली आहे. आजूबाजूला दुरूस्तीचे काम जोरात सुरू आहे.
याबाबत आरजेडी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी म्हटले की, जनतेचा विजय झाला आहे तर जनता विजय साजरा करेल, हाच संदेश सर्वांना पाठवला आहे.
त्यांनी म्हटले की, जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत कुणीही उमेदवार सेंटर सोडणार नाही. 9 नोव्हेंबरला तेजस्वी यादव यांचा वाढदिवस सुद्धा आहे. यावर जगदानंद म्हणाले, ज्याप्रकारे अगोदर वाढदिवस साजरा केला जात होता, तसाच यावेळी सुद्धा साजरा केला जाईल. कोणताही अतिरिक्त जल्लोष नसेल.
जगदानंद सिंह म्हणाले, आमचे श्रद्धास्थान लालू यादव यांना जामीन मिळालेला नाही, कारण काही लोकांची इच्छा नाही की त्यांनी शपथग्रहण सोहळ्याला हजर राहावे. जेव्हा ते बाहेर येतील तेव्हा आम्ही होळी आणि दिवाळी साजरी करू.
जवळपास सर्वच मोठ्या एग्झिट पोलमध्ये बिहारमध्ये महाआघाडीचा मोठा विजय होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आजतक अॅक्सिस माय इंडिया एग्झिट पोलनुसार, बिहारमध्ये एनडीएला 69 ते 91 जागा मिळू शकतात. तर महाआघाडीला 139-161 जागा मिळू शकतात. चिराग पासवान यांच्या एलजेपीला 3 ते 5 जागा मिळू शकतात. तर इतरांना 6-10 जागा मिळवण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री म्हणून सुद्धा तेजस्वी हे बिहारच्या लोकांची पहिली पसंत असल्याचे सांगितले जात आहे.