नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – या देशातील सर्व प्रश्नांचा संदर्भ हा जातीशी आहे. देशात जात पाळणारी जी व्यक्ती विदेशांत गेली, तिथेसुद्धा जातीचे जंतू घेऊन गेली. सबब, आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला असल्याचे प्रतिपादनज्येष्ठ साहित्यिक डॉ. धनराज डाहाट यांनी येथे केले.
मुक्तिवाहिनी आणि रिपब्लिकन मुव्हमेंट यांचे संयुक्त अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजनिर्मितीचे प्रथम मुखपत्र मूकनायक शताब्दी समारोहांतर्गत डाहाट यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. आंबेडकर सभागृह उरुवेला कॉलनी येथे हा कार्यक्रम पार पडला. ‘जाती अंताचे वर्तमान संदर्भ’ या विषयावर डॉ. डाहाट यांनी विस्तृत विवेचन केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशिवाय जातीविषयावर खरे संशोधन होऊ शकत नाही.
बाबासाहेबांनी जातीसंदर्भात मूलभूत विचार मांडले आहे. जातीच्या पायावर तुम्ही काहीही उभारू शकत नाही. राष्ट्र, नैतिकता उभारू शकत नाही, उभारण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तडे जातील. जातीच्या प्रश्नातून काहीही साध्य होणार नाही, असेही डॉ. बाबासाहेब स्पष्ट करतात. जातीच्या प्रश्नाला बाबासाहेब हे बुद्ध तत्त्वज्ञानातून पाहतात. म्हणूनच त्यांनी बुद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला, असेही डॉ. डाहाट यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. कवी इ. मो. नारनवरे यांचेही समयोचित भाषण झाले. प्रास्ताविक नरेंद्र शेलार यांनी तर संचालन का. रा. वालदेकर यांनी केले. नरेश वाहाणे, एन. एल. नाईक, दादाकांत धनविजय, राहुल दहीकर, दिलीप सूर्यवंशी, प्राचार्य भाऊ वासनिक, डॉ. विनोद डोंगरे, संजय गोडघाटे, सेवक लव्हात्रे, श्रीराम बन्सोड, धर्मराज निमसरकर, शिवचरण थूल, नलिनी डहाट यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.